शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा शिरूर–मलठण मार्ग शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागातील मुजोर आधिकार्याच्या निष्क्रीय कामगिरीमुळे अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. या अधिकाऱ्याला ठेकेदारांकडून नीट खड्डे सुद्धा बुजून घेता आले नाही. त्याचे कारणही तसेच आहे कारण हा मुजोर अधिकारी पुणे येथे राहत असून त्याचे या ठेकेदारांवर व रस्त्यावर त्यांचे कसलेच लक्ष नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन करूनही हा रस्ता आजही खड्ड्यांच्या विळख्यात तसाच आहे. डागडुजी केल्यानंतरही हा रस्ता असा खड्डेमय बनलेला आहे हे आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा निधी खर्च झाल्याचा दावा करण्यात आला, डागडुजीची कामे झाल्याचे दाखवण्यात आले; मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिरूर ते मलठण दरम्यानचा हा मुख्य मार्ग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. विशेषतः कोंढण ओढ्याजवळील परिसरात रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडून गेले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी तर रस्ता आहे की खड्ड्यांची मालिका, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर आधीच अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार तसेच व्यापारी वर्ग ये-जा करतो. शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी हाच प्रमुख मार्ग असल्याने खराब रस्त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. वाहनांची वारंवार दुरुस्ती, इंधनाचा वाढलेला खर्च आणि वेळेचा अपव्यय यामुळे नागरिकांचा त्रास दुपटीने वाढला आहे.
दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते; मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही दिवसांतच नव्याने टाकलेले डांबर उखडते, खडी बाहेर पडते आणि पुन्हा खड्डे तयार होतात. त्यामुळे हे काम केवळ कागदोपत्रीच होत असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत. “कामाचे बिल मात्र लाखोंमध्ये होते; पण रस्ता काही दिवसांतच पुन्हा उखडतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका वाहनचालकाने दिली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी बहुधा पुणे येथे मुक्कामी असतो. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी, कामाच्या गुणवत्तेची तपासणी आणि नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण याकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी वेळेवर पाहणी करत नसल्याने कंत्राटदारांवर कोणतीही देखरेख राहत नाही आणि निकृष्ट दर्जाची कामे सुरूच राहतात, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, या प्रश्नावर आता सामाजिक कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. “रस्त्याचे केवळ खड्डे बुजवण्याचे दिखाऊ काम नको, तर संपूर्ण रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करून दर्जेदार डांबरीकरण झाले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
तालुक्यातील इतर काही रस्त्यांची स्थिती सुधारत असताना शिरूर–मलठण मार्ग मात्र कायम दुर्लक्षित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्ते दुरुस्त करताना जर व्यवस्थित करता येत नसतील तर या मुजोर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून बदली करण्याची मागणी होत आहे.या मार्गावरील संताप लवकरच तीव्र आंदोलनाच्या रूपात उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…