महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार! राज ठाकरेंच्या भावनिक विधानांनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे घराण्याच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा राजकीयदृष्ट्या जवळ येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याबाबत 20 वर्षांनंतर व्यक्त केलेली भावना आणि अलीकडील काही घडामोडी या चर्चांना कारणीभूत ठरत आहेत.

‘पक्ष नव्हे, घर सोडल्याचं दुःख’

2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या राज ठाकरेंनी त्यावेळी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे’ असे विधान करत त्यांनी शिवसेनेशी कडाडून फारकत घेतली. मात्र, 2026 मध्ये तब्बल 21 वर्षांनंतर राज ठाकरेंच्या सुरात स्पष्ट बदल जाणवतो आहे.

“शिवसेना सोडणं म्हणजे केवळ पक्ष सोडणं नव्हतं, तर ते घर सोडण्यासारखं होतं,” असे भावूक विधान राज ठाकरे यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना नव्याने उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरेंसमोर दिले ‘सूचक’ संकेत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसमोर भाषण करताना राज ठाकरे म्हणाले, “गेल्या वीस वर्षांत काही गोष्टी मला उमगल्या आहेत आणि कदाचित त्या उद्धव ठाकरेंनाही उमगल्या असतील. जे झालं गेलं, ते आता विसरून जाऊया.” या एका वाक्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. हे केवळ औपचारिक वक्तव्य नसून, भविष्यातील राजकीय समीकरणांचा तो संकेत असल्याचे मानले जात आहे.

मंचावरची देहबोली ठरली चर्चेचा विषय

ठाकरे कुटुंबातील जवळीक केवळ शब्दांतच नव्हे, तर कृतीतूनही दिसून आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात दोन्ही भाऊ अत्यंत मोकळेपणाने वावरताना दिसले. सत्कारावेळी झालेली गळाभेट, स्मितहास्य आणि सहज संवाद हे क्षण उपस्थितांच्या लक्षात राहिले.

यावेळी रश्मी ठाकरे स्वतः राज ठाकरे यांना निरोप देण्यासाठी बाहेरपर्यंत आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला आणखी बळ मिळालं. ठाकरे कुटुंबातील देहबोली नेहमीच अर्थपूर्ण मानली जाते आणि यावेळी ती स्पष्टपणे सकारात्मक होती.

‘माझा काका’ लेखातून भावनिक कबुली

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘सामना’मध्ये राज ठाकरे यांनी लिहिलेल्या ‘माझा काका’ या लेखाने अनेकांना भावूक केलं. मातोश्रीवरील आठवणी, काकांबद्दलचा जिव्हाळा आणि घरापासून दूर गेल्याची खंत त्यांनी या लेखात मांडली आहे. “वडिलांचं छत्र आधीच हरपलं होतं आणि आता मी काकांपासूनही दूर गेलो, ही भावना मनाला खात होती. पक्षापेक्षा घरातून बाहेर पडण्याचं दुःख अधिक होतं,” अशी कबुली राज ठाकरेंनी दिली आहे.

राजकीय गरजाही जुळतायत

राजकीयदृष्ट्या पाहिल्यास, मनसेला 2009 नंतर अपेक्षित यश मिळालेलं नाही. संघटनात्मक मर्यादा आणि निवडणूक अपयशामुळे पक्षासमोर आव्हानं उभी आहेत. दुसरीकडे, शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटालाही मोठ्या संघटनात्मक ताकदीची गरज भासत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांतील निकालांनी ठाकरे ब्रँडची मुंबईतील ताकद अजूनही कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणं ही राजकीय अपरिहार्यता ठरू शकते, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

विलीनीकरण होणार की युती?

सध्या तरी थेट विलीनीकरणापेक्षा निवडणूक युती हा पहिला टप्पा असू शकतो, अशी चर्चा आहे. कार्यकर्त्यांची मानसिकता, नेतृत्वाचा प्रश्न आणि दोन्ही पक्षांची स्वतंत्र ओळख ही आव्हानं अद्याप कायम आहेत.

राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आता केवळ भावनिक चर्चेपुरती मर्यादित राहिलेली नाही. येणारा काळ, विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका, ठाकरे राजकारणाच्या नव्या पर्वाची नांदी ठरते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…

59 मिनिटे ago

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

18 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

22 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

22 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

22 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

22 तास ago