नवी दिल्ली: सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना एक अभूतपूर्व आणि भावूक घटना घडली. भाजपचे खासदार सी. सदानंदन मास्टर यांनी आपल्या भाषणादरम्यान चक्क आपला कृत्रिम पाय काढून सभागृहातील बाकावर ठेवला. त्यांच्या या कृतीमुळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला, तर नंतर वातावरण अत्यंत भावूक झाले.लोकशाहीचा खरा चेहरा देशासमोर मांडण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे सदानंदन मास्टर यांनी स्पष्ट केले. आपल्या पहिल्याच भाषणात ते अत्यंत आक्रमक आणि भावनाविवश झाले होते.
“माझे पाय कापले आणि इंकलाबच्या घोषणा दिल्या…”
३१ वर्षांपूर्वी केरळमध्ये आपल्यावर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देताना सदानंदन मास्टर म्हणाले,“जे लोक आज लोकशाही आणि सहिष्णुतेच्या गप्पा मारत आहेत, त्यांनीच माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. मी घरी परतत असताना मला पाडण्यात आले आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत माझे दोन्ही पाय कापून टाकले.”या हल्ल्यासाठी त्यांनी थेट सीपीएम कार्यकर्त्यांवर आरोप केला. सदानंदन मास्टर हे आरएसएसशी संबंधित आहेत.
सभागृहात गदारोळ, सीपीएमकडून आक्षेप
सदानंदन मास्टर यांनी बाकावर कृत्रिम पाय ठेवताच सीपीएमचे खासदार जॉन ब्रिटास यांनी नियमावलीचा हवाला देत तीव्र आक्षेप घेतला. सभागृहात कोणत्याही वस्तूचे प्रदर्शन करण्यास मनाई असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर प्रत्युत्तर देताना सदानंदन मास्टर म्हणाले,“तुम्ही मानवता आणि सहिष्णुतेच्या गप्पा मारता, पण तुमची राजकीय निष्ठा हिंसेवर आधारित आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.”अखेर सभापतींच्या सूचनेनंतर त्यांनी कृत्रिम पाय टेबलावरून हटवला. या वादादरम्यान वापरण्यात आलेले काही शब्द कामकाजातून वगळावेत, अशी मागणी सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी केली.
“आज मला उभं राहून भाषणही करता आलं नाही”
भाषणाचा शेवट करताना सदानंदन मास्टर यांनी अत्यंत जड अंतःकरणाने सांगितले,“सीपीआय-एमने दिलेल्या त्या यातनांमुळे आज मला माझे पहिले भाषण देताना उभेही राहता आले नाही.”त्यांच्या या विधानाने सभागृहातील अनेक सदस्य सुन्न झाले.
कोण आहेत सी. सदानंदन मास्टर?
सी. सदानंदन मास्टर हे केरळमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षक आहेत. ते केरळ भाजपचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.१२ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली, तर २१ जुलै २०२५ रोजी त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…