बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर एक कलाकार दिसतो, पण खरी पटकथा कुणी लिहिली आहे, हे रसिकांना कळत नाही. आणि या नाटकाचा खरा दिग्दर्शक कोण असेल, तर तो म्हणजे विनोद तावडे!
राजकारणात अनेक जण “मी, मी” करत फिरतात, पण काही जण “काम, काम” करत इतिहास घडवतात. तावडे हे दुसऱ्या प्रकारातले. महाराष्ट्रातून गेलेले हे शांत, संयमी, पण आतून पोलादी मनाचे नेते, बिहारसारख्या गुंतागुंतीच्या राजकारणात जाऊन बसले आणि तिथे त्यांनी अक्षरशः राजकीय गणिताची नवी वहीच उघडली.
बिहार म्हणजे काय? जात, समीकरणं, आणि सत्तेचे सतत बदलणारे आकडे! इथे सरळ रेषेत चालणारा माणूस राजकारणात टिकत नाही. पण तावडे यांनी वक्ररेषेलाच सरळ करून दाखवली. सप्टेंबर २०२२ ला प्रभारी म्हणून गेले तेव्हा भाजप सत्तेबाहेर. पण दोन वर्षांत अशी जादू केली की नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून पुन्हा भाजपचा हात धरला. ही केवळ राजकीय ‘घरवापसी’ नव्हती, तर पडद्यामागून खेळलेली बुद्धिबळाची चाल होती!
आता पुढचा अंक – मुख्यमंत्रीपद!
बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री? हे ऐकूनच अनेक जुन्या राजकीय पंडितांनी चष्मे पुसले असतील! पण सम्राट चौधरी यांच्या शपथविधीने ते स्वप्न वास्तवात उतरले.
हे कसं घडलं?
तर हे “एक ना धड, भाराभर चिंध्या” धोरण नव्हतं. हे होतं “एक लक्ष्य, अचूक वार” धोरण!
२०२५ च्या निवडणुकीत तावडे यांनी बूथ लेव्हलपासून आखलेली रणनीती म्हणजे जणू एखाद्या सैन्याचा शिस्तबद्ध मार्च! प्रत्येक कार्यकर्ता सज्ज, प्रत्येक मतदाराशी संवाद, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे — “जातीच्या पलीकडे विकास” हा मंत्र!
बिहारसारख्या राज्यात जात हा धर्म असतो. पण तावडे यांनी त्या धर्मालाच विकासाची ‘प्रवचनं’ दिली. आणि काय आश्चर्य! मतदारांनी ती ऐकलीही!
दरम्यान, प्रशांत किशोर यांचा ‘जन सुराज्य’ हा वेगाने वाढणारा प्रयोग होता. पण तावडे यांनी त्याचा फुगा असा फोडला की आवाजही बाहेर आला नाही.
हे सगळं पाहिल्यावर लोक म्हणू लागले — “हा माणूस साधा नेता नाही, हा तर बिहारचा ‘चाणक्य’ आहे!”
पण खरी गंमत इथेच आहे!
भाजपमध्ये श्रेय घेण्याची पद्धत नाही. इथे “मी केलं” म्हणणाऱ्यापेक्षा “आपण केलं” म्हणणाऱ्यालाच मान मिळतो. त्यामुळे तावडे यांच्यासारखे अनेक शिल्पकार पडद्यामागेच राहतात.
“हा माणूस इतका शांत आहे की त्याच्या शांततेतच राजकीय वादळं तयार होतात!”
आजच्या राजकारणात ‘तोंडावर बोलणारे’ खूप आहेत, पण ‘काम करून दाखवणारे’ कमी. तावडे यांनी सिद्ध केलं की, गाजावाजा न करता सुद्धा इतिहास लिहिता येतो.
बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसवणारा हा दिग्दर्शक, पुढे कोणता अंक रंगवणार?
कारण रंगमंच तयार आहे
कलाकार सज्ज आहेत
आणि प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा त्या पडद्यामागच्या ‘चाणक्या’कडेच लागल्या आहेत!
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…