मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणाला अवघ्या तीन दिवसांतच मोठा वेग आला आहे. आज सायंकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या अनपेक्षित आणि वेगवान घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विविध पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या शपथविधीवर भाष्य केले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “राजकारणात खुर्ची जिंकली, सार्वजनिक जीवनात खुर्ची जिंकली, पण माणूस हरला आहे,” असे परखड मत त्यांनी मांडले.
शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर काही कालावधी गेल्यानंतर या घडामोडी घडल्या असत्या, तर त्या साहजिक वाटल्या असत्या. मात्र इतक्या तातडीने हालचाली होणे धक्कादायक आहे. कालच राख सावडण्याचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांचे मुंबईकडे प्रयाण, विविध राजकीय नेत्यांची वक्तव्ये हे सर्व मनाला पटणारे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यात आले. शनिवारी मध्यरात्रीच त्या मुंबईत दाखल झाल्या होत्या. आज दुपारी विधानभवनात झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही त्या उपस्थित होत्या. या सगळ्या घडामोडींवर सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष होते आणि शिवसेनाही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून होती.
संजय शिरसाट पुढे म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर पक्षाची पुढील दिशा, राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कोण असणार, हे सगळे प्रश्न पुढील काळात स्पष्ट होतील. मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडींमधून सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. शासकीय दुखवटाही पूर्ण होण्याआधीच हे राजकारण सुरू झाले, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, यापूर्वी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चांमधून एकत्रिकरणाचा निर्णय सर्वमान्य होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्याची परिस्थिती बदललेली असून, आता राजकारणात सामूहिक निर्णयाचे नवे वारे वाहतील, असे त्यांनी सूचक वक्तव्य केले.
या संपूर्ण प्रक्रियेत शरद पवार यांना कितपत विश्वासात घेण्यात आले, याबाबत शंका असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले. “या निर्णयामध्ये शरद पवार साहेबांचा सल्ला घेतला गेला की नाही, हे स्पष्ट नाही. कदाचित पक्षातील काही नेत्यांनी आणि सल्लागारांनीच हा निर्णय घेतला असावा,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घडामोडींमध्ये जी भूमिका घेतील, तीच भूमिका शिवसेना घेईल, असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटातील आमदार आणि मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणे ही आमची राजकीय गरज आहे. त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याची आमची कोणतीही मानसिकता नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…
लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…