महाराष्ट्र

संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही; एकनाथ शिंदेंचा ठाम निर्धार

अहिल्यानगर : महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी आहे. संत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने राज्य सरकार काम करत असून, संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशी येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ह.भ.प. रामगिरी महाराज, आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे पाटील, रमेश बोरनारे, विवेक कोल्हे, आशुतोष काळे, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह संत-महंत आणि हजारो भाविक उपस्थित होते.

गंगागिरी महाराजांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या भूमीला नमन करत शिंदे म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या वृद्धीसाठी १७९ वर्षांपूर्वी सुरू झालेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही भक्तिभावाने सुरू आहे. अखंड नामस्मरणामुळे परिसरात भक्ती, प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या सप्ताहात सहभागी होणारा प्रत्येक भाविक हा विठ्ठलस्वरूप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘गावाची एकी तर देवाची कृपा नक्की’ याचा प्रत्यय या सप्ताहातून येत असल्याचे शिंदे म्हणाले. जातीभेद, श्रीमंत-गरीब असा भेद विसरून विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी एकत्र येणे हीच संतपरंपरेची खरी ताकद आहे. आठ ते दहा हजार वारकरी एकाच तालात १६८ तास भजन करतात. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली असली, तरी विठ्ठलाच्या भक्तीपुढे कोणताही जागतिक विक्रम छोटाच असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शिंदे यांनी सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचाही उल्लेख केला. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच बळीराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्यापोटी पाच हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काकड आरती, ज्ञानेश्वर महाराजांची गाथा, भगवद्गीतेचे पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘घ्यायचे असेल तर हरिनाम, द्यायचे असेल तर अन्नदान; जगायचे असेल तर नम्रता आणि बुडायचे असेल तर अहंकार’, हा संतांचा संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

संतपरंपरा, हिंदू संस्कृती आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत ‘हे सरकार सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, लाडक्या बहिणींचे, वारकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहे,’ असे शिंदे म्हणाले. संत-महंतांच्या आशीर्वादातून सरकारला प्रेरणा मिळत असल्याचे सांगत त्यांनी रामगिरी महाराज आणि सप्ताहाच्या आयोजकांचे अभिनंदन केले. अखंड नामाचा गजर आणि पांडुरंगाचा आशीर्वाद कायम राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष; नातेवाईकाविरोधात पोक्सोचा गुन्हा

नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक…

57 सेकंद ago

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या चर्चेला वेग; महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नव्या टीमची घोषणा केल्यानंतर आता पंतप्रधान…

3 मिनिटे ago

पंजाबमध्ये भाजपचा ‘एकला चलो’चा नारा; २०२७ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

अकाली दलासोबतची युती संपुष्टात; भाजपकडून सर्व ११७ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा पंजाब: पंजाबच्या राजकारणात मोठी…

19 मिनिटे ago

रूपाली चाकणकरांची हॉटेल व्यवसायात एन्ट्री; ‘द नाईन्स’च्या उद्घाटनाला राजकीय दिग्गजांची हजेरी

पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले…

25 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; हर्षवर्धन सपकाळ

१३ दिवसांपासून उपोषण सुरू; महायुती सरकारवर आदिवासीविरोधी असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप मुंबई: राज्यातील पुणे, नाशिक,…

29 मिनिटे ago

VJTI वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर ॲड. अमोल मातेले आक्रमक; प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), माटुंगा येथील वसतिगृहातील अस्वच्छता, दूषित पिण्याचे पाणी, बंद…

32 मिनिटे ago