अक्कलकोट: श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी म्हेत्रे यांच्यात कधीही श्रीमंतीचा दर्प आला नाही. त्यांच्यात अहंकार आला नाही, ते कायम जमिनीवर राहिले तर अनेक लोक वडिलांच्या नावावर बढाया मारतात, फुशारक्या मारतात, असा सणसणीत टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे इथलं मोठं प्रस्थ होतं. म्हेत्रे परिवाराने कधी जात धर्म पक्ष पाहिला नाही, आलेल्या माणसाचे काम केले. त्यामुळे इथल्या हिंदु मुस्लिम बांधवांचा म्हेत्रे परिवाराला कायम पाठिंबा राहिला आहे. श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी यांच्यात कधीही अहंकार आला नाही. अनेक लोक वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात, मात्र सिध्दारामजी यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत, ते कायम जमीनीवर राहिले. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आज सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर केली. सिध्दाराम म्हेत्रे अनुभवी आहेत. त्यांच्या नावात राम आहे. ते शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली आणि राज्याने एक मोठा उठाव पाहिला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचलले. केवळ भारताच नव्हे तर जगातील ३३ देशांनी या उठावाची दखल घेतली. जनतेनेही या उठावाला प्रतिसाद दिला. आज शिवसेनेचे ६० आमदार आहेत. एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील. आधीचे सरकार स्थगिती सरकार होते आताचे सरकार प्रगतीचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचे काम आम्ही करतोय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकार आहे. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक यानुसार काम करायचे आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
जनतेपुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक
सभेसाठी तब्बल ११ तास प्रतिक्षा करणाऱ्या जनतेपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी नतमस्तक झाले. त्यांनी इथंवर कसे पोहोचलो तो अनुभव कथन केला. ते म्हणाले की आज दुपारी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करुन मंत्री दादा भुसेंसह नाशिक येथे हॅलिकॉप्टरने पोहोचलो. मात्र हवामान खराब असल्यामुळे सोलापूर विमानतळावर विमान उतरु शकत नाही, असा संदेश मिळाला. त्यानंतर कार्यक्रम रद्द करावा, असे सुचवण्यात आले, मात्र आपण स्वामी समर्थांची नगरी अक्कलकोट येथे पोहोचणारच, असा निश्चय केला होता. पुण्याने रस्ते मार्गे येण्याचा विचार केला. मात्र केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करुन गुलबर्गा विमानतळावर विमानाच्या लॅंडिंगची परवानगी घेतली. सिध्दारामांना आणि तुम्हाला भेटण्याची इच्छाशक्ती प्रबळ होती म्हणून इथवर पोहोचलो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…