यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात दाखल होणार
मुंबई: दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.“बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील, आणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना पूर्वीचा सुवर्णकाळ आणि नंतरची घसरण
कोरोना महामारीपूर्वी एसटीकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. मात्र महामारी आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या चार-पाच वर्षांत बसखरेदी रखडली. परिणामी २०२४ अखेर बसेसची संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली.
दरम्यान, राज्य शासनाने महिलांना तिकिटात ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला. सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात; मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत.
८,३०० बसेसचा भव्य आराखडा
एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत २० ते २५ हजार बसेस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यास राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून, यंदा पहिल्या टप्प्यात ८,३०० बसेस दाखल होणार आहेत.
त्यामध्ये ३,००० ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने आगमन
या बसेसना ‘राजमाता जिजाऊ साहेब’ यांचे नाव देण्यात आले असून दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर धावणार.
५,००० साध्या बसेस: निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
१०० मिडी बसेस: दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी
२०० अत्याधुनिक बसेस
खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी या सर्व बसेस ताफ्यात आल्यावर दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस आहे.
खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ साधण्याचा निर्धार
सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये, तर उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपये आहे. म्हणजेच रोजची तूट १ ते १.५ कोटींच्या घरात आहे.मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी हा नफा कमावणारा उद्योग नाही; ती राज्यातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र किमान तोटा टाळण्यासाठी खर्च-उत्पन्नाचा समतोल साधणे आवश्यक आहे. नवीन बसेस आल्यावर उत्पन्न निश्चित वाढेल आणि एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल.”
‘लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत
ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या, आदिवासी पाड्यांपर्यंत सेवा, दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या — या सर्वांमुळे एसटीची पकड पुन्हा मजबूत होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता नव्या जोमाने, नव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे.“यावर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल, हा आमचा दृढ विश्वास आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी ठामपणे सांगितले.
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…
मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…