मुंबई: शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत आहे. “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा” या भूमिकेतून शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी सुमारे सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण दहा हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला.
‘लाडकी बहीण’चा पुढील हप्ताही वेळेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ताही नियोजित वेळेत पात्र महिलांच्या खात्यावर जमा होईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. ही योजना सुरू झाल्यापासून महिलांना आर्थिक आधार देण्याचे काम होत असून, कितीही प्रयत्न झाले तरी ही योजना कधीही बंद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार
तरुणाईच्या हाताला काम मिळणे आवश्यक असून, शिक्षण, रोजगार आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे शिंदे म्हणाले. स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, उद्योग-उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
“नुसती खोटी आश्वासने देऊन जनतेने ज्यांना नाकारले आहे, त्यांनी तरुणांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी केलेले काम पाहावे,” असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
देशातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचा दावा करत, मोदींची देशात आणि जगभरातील लोकप्रियता ही विरोधकांच्या पोटदुखीचे कारण असल्याचेही शिंदे म्हणाले. तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
जरांगे-पाटील यांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा
मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मकपणे चर्चा करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या भेटीसाठी महायुतीचे मंत्री गेले असून, प्रश्न समजून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. या चर्चेतून निश्चितच मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गणेशभक्तांसाठी कोकणात विशेष सुविधा
गणेशोत्सवासाठी कोकणात लाखो गणेशभक्त जात असल्याने त्यांच्या स्वागतासाठी आणि प्रवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. एसटीच्या माध्यमातून गणेशभक्तांसाठी मोफत सुविधा देण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवला जात आहे. गणेशभक्तांच्या स्वागतासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती करण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांवरच पुढे जाणार’
गणेशोत्सवातील मिरवणुकांच्या संदर्भात हिंदुत्वाची भूमिका कमकुवत करण्याचा किंवा वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला, तरी आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवरच पुढे जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.“गणेशोत्सव, गणेशभक्त आणि हिंदू संस्कृतीशी जोडलेल्या परंपरांचा सन्मान राखण्याची आमची भूमिका आहे,” असेही त्यांनी सांगितले.
मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ निवड झालेल्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज…
मुंबई: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात प्रदीर्घ आणि समर्पित कार्य करणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व…
कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी…
बार्शी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेल्या दत्त कला…
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास…