अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी रुग्णालयाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिटवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी ऑडिटच्या नूतनीकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. केवळ चौकशीची घोषणा करून आरोग्यमंत्री जबाबदारी झटकू शकत नाहीत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आठ दिवसांत जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे सांगत, दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
२०२२ मधील घटनेचा अहवाल अद्याप नाही
रुग्णालयाच्या पाहणीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी २०२२ मधील व्हेंटिलेटरशी संबंधित घटनेचा मुद्दा उपस्थित केला. त्या घटनेची चौकशी झाली, मात्र चार वर्षे उलटूनही अहवाल आला नाही आणि कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.
२०२२ मधील घटना आणि सध्याच्या दुर्घटनेतही ‘शिल्लर’ कंपनीच्या व्हेंटिलेटरबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे या उपकरणांची सखोल तपासणी करून ती रुग्णालयातून हटवावीत, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये या कंपनीचे व्हेंटिलेटर वापरले जात असल्याचा दावा करत, ही उपकरणे चायना मेड आहेत का आणि कोणाच्या दबावामुळे त्यांची खरेदी करण्यात आली? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. याबाबत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मृत बालकांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत द्या
अमरावतीतील या घटनेचा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करून सरकारला जाब विचारणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आगीच्या घटनेत धाडसाने सहा बालकांचे प्राण वाचवणाऱ्या परिचारिकेच्या कामाची दखल सरकारने घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अमरावती महापालिका विरोधी पक्षनेते विलास इंगोले, जिल्हाध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखेडे यांच्यासह किशोर बोरकर, अनिकेत ढेंगले, वैभव वानखेडे, वैभव देशमुख आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे : चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि सुरक्षेच्या…
मांड्या : कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील उक्कड मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाजप आमदाराच्या मुलीचा कर्तव्यावर…
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील वाढत्या भूमिकेची चर्चा पुन्हा एकदा सुरू…
कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी…
नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक…
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नव्या टीमची घोषणा केल्यानंतर आता पंतप्रधान…