रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या एका कंपनीच्या एचआर मॅनेजरला अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सॲप संदेशाद्वारे जीवे मारण्याची तसेच त्यांच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिस ठाण्यात NCR (प्राथमिक नोंद) करण्यात आल्याची माहिती आहे.
हरीश मधुकर पाटील (वय ४८) हे रांजणगाव गणपती येथील डाय अल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ३० जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कंपनीतून पुण्याकडे घरी जात असताना त्यांच्या व्हॉट्सॲपवर अज्ञात क्रमांकावरून धमकीचा संदेश आल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.
‘रांजणगाव एमआयडीसीमधील तुझे दिवस संपले आहेत. पुन्हा रांजणगाव एमआयडीसीमध्ये आला तर तुझ्या मुलांचे आयुष्य संपवू’, अशा आशयाचा संदेश आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ‘आजची रात्र तुझी शेवटची रात्र आहे’, असा आणखी एक संदेश आल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर ३१ जुलै रोजी अन्य मोबाईल क्रमांकावरून फोन करुन पाटील यांचा पत्ता, कंपनीचे नाव तसेच कंपनीच्या एमडीचे नाव याबाबत माहिती विचारण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास धमकीसाठी वापरण्यात आलेल्या क्रमांकावरील काही संदेश डिलीट झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, अधिकारी आणि कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
उद्योग वाढले पाहिजेत; दहशत नाही…
रांजणगाव MIDC ही पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची औद्योगिक वसाहत असून, या परिसरातील विविध कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षितता हा केवळ कंपनी प्रशासनाचा प्रश्न नसून हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या भवितव्याशी संबंधित विषय आहे.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, सुरक्षितता आणि अन्य कारणांमुळे काही कंपन्या स्थलांतर करण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात समोर आलेली ही घटना गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
एखाद्या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा प्रकारचे धमकीचे संदेश येत असल्यास त्यामागील कारण काय आहे, धमकी देणारी व्यक्ती कोण आहे आणि संबंधित व्यक्तीचा औद्योगिक क्षेत्राशी काही संबंध आहे का, याचा तपास होणे आवश्यक आहे.
प्रशासनाने सुरक्षेचा आढावा घ्यावा…
रांजणगाव MIDC परिसरात पोलिस गस्त वाढविणे, प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे, कंपनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था तपासणे आणि कामगार व अधिकाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या घटनेकडे राज्याच्या मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
रोजगाराचे केंद्र की असुरक्षिततेचे ठिकाण…?
रांजणगाव MIDC मध्ये उद्योग आले पाहिजेत, रोजगार वाढला पाहिजे आणि स्थानिक युवकांना संधी मिळाली पाहिजे. मात्र त्याचबरोबर अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना सुरक्षित वातावरण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकीचे संदेश मिळाल्याच्या घटनेने औद्योगिक सुरक्षेबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…
मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…
तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि…
कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच…
मुंबई: विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी…