इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून भिक्षावृत्तीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सराफा बाजार परिसरात भीक मागणाऱ्या एका दिव्यांग भिकाऱ्याकडे चक्क तीन पक्की घरं, तीन रिक्षा आणि एक कार असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. मांगीलाल असं या भिकाऱ्याचं नाव असून, महिला व बालविकास विभागाच्या बचाव पथकाच्या कारवाईत ही माहिती उघडकीस आली.
सराफा बाजार परिसरात मांगीलाल सर्वपरिचित होता. लाकडी गाडीवरून फरफटत चालणं, पाठीवर पिशवी आणि हातात चपला घेऊन अत्यंत असहाय अवस्थेत फिरणं, यामुळे अनेकांची त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होत असे. तो कोणावरही दबाव टाकत नसे किंवा मोठ्या आवाजात भीक मागत नसे. त्यामुळे त्याची शारीरिक अवस्था पाहून लोक स्वतःहून त्याला पैसे देत असत.
तपासादरम्यान असे समोर आले की, मांगीलालच्या अपंगत्वामुळे शासनाकडून त्याला रेडक्रॉस सोसायटीमार्फत यापूर्वीच १ बीएचके घर देण्यात आले होते. काही काळ तो आश्रमातही वास्तव्यास होता. मात्र, सर्व सुविधा उपलब्ध असूनही त्याने भीक मागणं हेच उत्पन्नाचं साधन बनवलं.
रेस्क्यू टीमने केलेल्या चौकशीत मांगीलालकडे भगतसिंग नगरमध्ये १६×४५ फुटांची तीन मजली इमारत, शिवनगर भागात ६०० स्क्वेअर फुटांचं घर आणि अलवास भागात १ बीएचके घर असल्याचं निष्पन्न झालं. या सर्व मालमत्तांची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे.
इतकंच नाही तर मांगीलालकडे स्वतःच्या तीन रिक्षा असून त्या भाड्याने चालवल्या जात आहेत. तसेच त्याच्याकडे ‘डिझायर’ कारही आहे, जी तो स्वतः वापरत नसून भाड्याने देऊन त्यातून कमाई करतो.
चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मांगीलाल हा केवळ भीक मागत नव्हता, तर सावकारीचाही व्यवसाय करत होता. सराफा बाजार परिसरातील अनेक लोकांना त्याने व्याजाने पैसे दिल्याचं त्याने कबूल केलं आहे. तो रोज भीक मागण्यासोबतच व्याजाची वसुली करण्यासाठीही बाजारात जात असे. भीक आणि व्याजाच्या माध्यमातून तो दररोज ४०० ते ५०० रुपये कमवत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, कारवाईदरम्यान मांगीलालने आपली बाजू मांडताना सांगितलं की, तो कोणाकडेही जबरदस्तीने पैसे मागत नाही आणि लोक स्वेच्छेने त्याला मदत करतात. मात्र, प्रशासनाच्या मते, संपन्न असूनही खोटा असहायपणा दाखवून भीक मागणं हा कायद्याने गुन्हा आहे.
नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांनी सांगितलं की, मांगीलालविरोधात सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याच आधारावर भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…
मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…
सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…