२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी
ब्रम्हपुरी : तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा दर्जा आणि संथगतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या कालव्याला अवघ्या वर्षभरातच अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे सिंचनाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान कामाचा निकृष्ट दर्जा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटदार तसेच सिंचन विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले.
गोसेखुर्द उजव्या कालव्यावरील ‘क्रिटिकल पॅचेस’च्या बांधकामासाठी एम.के.एस., बीआयपीएल आणि सरला या कंपन्यांना तब्बल २३५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र काम पूर्ण करण्याची मुदत संपूनही आतापर्यंत केवळ १५ टक्के कामच पूर्ण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे काम पूर्ण झाले आहे, त्याचाही दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाल्याने या संपूर्ण कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचा आधीच आंदोलनाचा इशारा
कालव्याच्या कामाला होत असलेला विलंब आणि पाणी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने यापूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला आहे.
पाहणीदरम्यान आमदार विजय वडेट्टीवार यांनी कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांच्या संगनमतामुळे कामाचा दर्जा खालावल्याचा गंभीर आरोप केला. “शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याशी खेळ केला जात आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच निकृष्ट काम केल्याचा आरोप असलेल्या एम.के.एस. कंपनीला तातडीने काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांच्यासह सिंचन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेत तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.
गोसेखुर्दसारख्या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पात निकृष्ट काम, विलंब आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळालेच पाहिजे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
कालवा पाहणीवेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, उपनगराध्यक्ष डॉ. नितीन उराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, सुधीर शिउरकर, संजय राऊत, विनोद बर्ले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…
1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये…