संभाजीनगर ही बाबासाहेबांची कर्मभूमी; संविधान सर्वसमावेशकतेचे सर्वोत्तम उदाहरनार्थ; मंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर: संविधान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील वंदे मातरम सभागृह येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट उपस्थित होते. कार्यक्रमास मा. आयुक्त, समाज कल्याण विभाग श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, प्रादेशिक उपायुक्त डॉ. दीपक खरात, माजी महापौर नंद कुमार घोडिले, जात पडताळणी समिती अध्यक्ष हरपाळकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रास्ताविकातून संविधान जागृतीची दिशा स्पष्ट केली. बार्टी मुख्यालय, पुणे येथे उभारण्यात आलेल्या ‘कोणशील’चे डिजिटल स्वरूपात उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
“प्रत्येक घरात संविधानाची गरज”; डॉ. नीलम गोऱ्हे
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून संविधान व सामाजिक न्याय या विषयाला व्यापक ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ जोडत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,“आपण आज उद्देशिका वाचली आणि भारताच्या राज्यघटनेत दिलेल्या समानतेच्या अधिकारांची पुन्हा जाण करून घेतली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असामान्य दूरदृष्टीने देशासाठी समतेचा पाया घातला. महिलांना मतदानाचा अधिकार असो, एकपत्नीत्वाचा कायदा असो किंवा हिंदू कोड बिल — या सर्व सुधारणांसाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला.” त्यांनी तरुण पिढीला आणि जनतेला आवाहन करत सांगितले, “प्रत्येक गावात संविधान पोहोचवणे गरजेचे आहेच, पण आता प्रत्येक घरात संविधान पोहोचले पाहिजे. घरातच मुलींचे अत्याचार, हुंडा, छळ यांसारख्या समस्या घडत असतात. समाजमाध्यमांवरील असंयमित वक्तव्ये व द्वेषपूर्ण भाष्येही आज आव्हान ठरत आहेत. संविधानाचा खरा अर्थ व मूल्ये आपल्या वर्तनात उतरायला हवीत.”
डॉ. गोऱ्हे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या उपक्रमांचे कौतुक करत बार्टीचे मुख्य कार्यालय संभाजीनगरमध्ये येणार असल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले. संभाजीनगर हे केवळ मराठवाड्याचे नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे केंद्र आहे, असे सांगत त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याचे महत्त्व मांडले.
बाबासाहेबांची कर्मभूमी संभाजीनगर… संविधान सगळ्यांसाठी; मंत्री संजय शिरसाट
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत संविधानाच्या महत्त्वावर भाष्य केले. संभाजीनगर ही बाबासाहेबांची कर्मभूमी असल्याने येथे संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणं अत्यंत अर्थपूर्ण आहे. संविधानाने आपल्याला न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता दिली. अतिरेकी असो वा कुणीही—कायद्यापुढे सर्व समान आहेत. लोकशाहीची मुळे रुजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबासाहेब. ते पुढे म्हणाले, “पुढील दोन महिन्यांत बार्टीचे मुख्य कार्यालय संभाजीनगरमध्ये येत आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या काळात या शहराचे केंद्र म्हणून महत्त्व ओळखले होते. संविधान सर्वांसाठी आहे आणि ते वंचित घटकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. कार्यक्रमात अधिकारी, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधान दिनाचे औचित्य साधत समाज जागृतीचे महत्त्व दोन्ही मान्यवरांनी पटवून दिले.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…