मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष राजा राजापूरकर, ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष धर्मेंद्र यादव तसेच वार्डाध्यक्ष कुणाल इंकर उपस्थित होते.
निवेदनात घाटकोपर येथील आझाद नगर, लालबत्ती डोंगर, सोनिया गांधी नगर, विक्रोळी येथील पार्क साईट, खंडोबा टेकडी तसेच भांडुप परिसरात मुसळधार पावसानंतर वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे नमूद करण्यात आले. या भागांतील हजारो नागरिक भीतीच्या छायेखाली राहत असून अनेक घरे धोकादायक स्थितीत असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता कायम असल्याचे प्रतिनिधीमंडळाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
प्रतिनिधीमंडळाने प्रशासनाकडे धोकादायक डोंगर उतारांचे महसूल विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, भूगर्भशास्त्र तज्ज्ञ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच आझाद नगर, लालबत्ती डोंगर, सोनिया गांधी नगर, पार्क साईट, खंडोबा टेकडी आणि भांडुप परिसरात तातडीने आरसीसी संरक्षण भिंती उभारणे, स्लोप स्टॅबिलायझेशन, रॉक बोल्टिंग, रॉकफॉल नेटिंगसारख्या अभियांत्रिकी उपाययोजना राबविणे, सक्षम जलनिस्सारण व्यवस्था विकसित करणे आणि अतिधोकादायक भागातील नागरिकांसाठी आवश्यक असल्यास तात्पुरत्या पुनर्वसनाची योजना तयार करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय मान्सूनपूर्व सर्व धोकादायक ठिकाणांची पाहणी करून कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा तसेच या सर्व कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी ॲड. अमोल मातेले म्हणाले की, दरड कोसळल्यानंतर मदतकार्य करण्यापेक्षा अशा दुर्घटना घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. मानवी जीवन अमूल्य असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिनिधीमंडळाने मान्सूनपूर्व आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित विभागांना त्वरित निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…