पुणे: पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारची ‘आई’ पर्यटन योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिला उद्योजिकांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, पुणे विभागातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या माहितीनुसार, राज्यभरातून आतापर्यंत सुमारे ४ हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,७०० हून अधिक अर्ज एकट्या पुणे विभागातून आले आहेत. म्हणजेच राज्यातील एकूण अर्जांपैकी ४० टक्क्यांहून अधिक अर्ज पुणे विभागातील महिलांनी केले आहेत.
महिलांनी पर्यटन क्षेत्रात केवळ नोकरी न करता स्वतःचे उद्योग उभारावेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने २०२३ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत हॉटेल, होम-स्टे, ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट तसेच पर्यटनाशी संबंधित स्टार्टअप सुरू करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जावरील संपूर्ण व्याजाचा भार राज्य सरकार उचलत असल्याने लाभार्थींना हे कर्ज बिनव्याजी मिळते.
योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्यासोबतच महिलांना ‘टुरिस्ट गाईड’ म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय वाढविणे, तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे महिलांसाठी अधिक सुलभ होत आहे.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील महिलांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. या भागातील ऐतिहासिक वारसा, गड-किल्ले आणि निसर्ग पर्यटनामुळे पर्यटन व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने महिलांचा या योजनेकडे विशेष कल दिसून येत आहे.
दरम्यान, कर्ज मंजूर होत असले तरी सरकारकडून व्याज परताव्याची रक्कम वेळेत जमा होत नसल्याची तक्रार लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे व्याज परतावा नियमित आणि वेळेत मिळावा, अशी मागणी महिला उद्योजिकांनी केली आहे.
पर्यटन संचालनालय, पुणे यांनी सांगितले की, ‘आई’ पर्यटन योजनेमुळे महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय उभारण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळत असून, पुणे विभागातील महिलांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे.
मुंबई: विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा तसेच स्वतःची…
मुंबई : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड…
मुंबई: देशातील राजकीय वातावरण बदलले असून जनता आता भाजपा-मोदी-शाह सरकारला प्रश्न विचारत आहे. त्यामुळे सरकार घाबरले…
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या…
मुंबई: जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड…
मुंबई : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेत सुधारणा…