प्रवास होणार वेगवान
पुणे: पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेले खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यातील एक बोगदा शनिवारपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास लवकरच कमी होणार आहे.
पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट हा एस-आकाराच्या तीव्र वळणांमुळे नेहमीच अपघातप्रवण आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत होता. अनेकदा या घाटातून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना ३० ते ४५ मिनिटांचा वेळ लागत होता. मात्र बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास केवळ १० ते १५ मिनिटांत होणार असून तब्बल २० मिनिटांची बचत होणार आहे.
दोन अत्याधुनिक बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खंबाटकी घाटात दोन स्वतंत्र बोगदे उभारण्यात येत आहेत. पुण्याच्या दिशेने आणि साताराच्या दिशेने असे दोन बोगदे असून प्रत्येक बोगद्यात तीन लेनची सुविधा उपलब्ध आहे. या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
साताराहून पुण्याच्या दिशेने जाणारा बोगदा १७ जानेवारीपासून सर्वसामान्य वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र बोगद्याच्या उताऱ्याजवळ दरी पुलाचे काम सुरू असल्याने सध्या फक्त हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जड वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करता येणार आहे.
अपघात आणि वाहतूक कोंडीवर आळा
खंबाटकी घाटातील तीव्र वळणे, अरुंद रस्ता आणि दुहेरी वाहतुकीमुळे वारंवार अपघात आणि मोठी वाहतूक कोंडी होत होती. ही समस्या लक्षात घेऊनच २०१९ मध्ये बोगद्यांचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. कोरोना काळात कामात अडथळे आले असले तरी आता हा प्रकल्प वेगाने पूर्णतेकडे जात आहे.
मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार
डाव्या बाजूचा बोगदा १३०० मीटर तर उजव्या बाजूचा बोगदा १२२४ मीटर लांबीचा आहे. पुण्याच्या दिशेने बोगदा संपल्यानंतर उभारण्यात येणाऱ्या दरी पुलाचे काम सध्या १४ ते १५ टक्के पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान शनिवारी एका बोगद्यात यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सध्याचा खंबाटकी घाट रस्ता इतिहासजमा होणार आहे. यामुळे पुणे–सातारा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होणार आहे.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…