मुंबई: मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात केलेल्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन मंगळवारी मागे घेतलं. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीनेही फडणवीसांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे फडणवीसांचं कौतुक करतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थेट उल्लेख न करता तर उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख करत लक्ष्य करण्यात आलं आहे.
फडणवीसांनी समंजस संवेदनशीलता दाखवली
“मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. परंपरागत कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याने कोणावरही अन्याय न होता अशा कुटुंबांना न्याय देणारा तोडगा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मोठा प्रश्न सन्मानजनक रीतीने मार्गी लावला याबद्दल त्यांचे अभिनंदन!” असं महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, “राज्यातील प्रत्येकास न्याय मिळावा हा प्रत्येकाचा हक्क असून तो जपण्याची समंजस संवेदनशीलता त्यांनी दाखवली आणि आंदोलनाच्या नेत्यांनीही ती समजून घेतली याबद्दल त्यांचेही अभिनंदन,” असंही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
शरद पवारांना केलं लक्ष्य
“या आंदोलनाची दिशा भरकटवून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न स्वतःस जाणते मानणाऱ्या काही नेत्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या आडून आपल्या मतांचे आरक्षण करण्याचा काहींचा डाव होता. इतक्या संवेदनशील विषयावरही मविआतील नेते राजकारण करीत महाराष्ट्र तापवण्याचा प्रयत्न करूत होते. त्यांचे हे प्रयत्न तसेच घटनेत दुरुस्ती केल्याखेरीज तोडगा शक्य नाही असे सांगत हा तिढा केंद्र सरकारच्याही गळ्यात घालण्याचा त्यांचा धूर्त प्रयत्न फडणवीस यांनी हाणून पाडला,” असं म्हणत थेट शरद पवारांचा उल्लेख न करता उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांनी या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्याचाच संदर्भ देत उपाध्येंनी आपल्या पोस्टमधून थेट नाव न घेता टोला लगावल्याचं दिसत आहे.
उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
“अन्यथा मार्ग निघाला नसताच, पण न्याय्य मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समाजातील पात्र कुटुंबांची फसवणूक झाली असती. उद्धव ठाकरे यांना या प्रश्नाचे फारसे ज्ञान नाही त्यामुळे सरकारला विरोध करण्याव्यतिरिक्त कोणतीच ठोस भूमिका न घेता त्यांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. तसेही त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही सामाजिक प्रश्नांची जाण नाहीच. आपल्याला अर्थसंकल्प कळत नाही, ऊसाचे राजकारण माहीत नाही, शेतीतले काही समजत नाही अशा अनेक बाबतीत त्यांनी स्वतःच तशी कबुली दिली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात सरकारच्या विरोधात राहण्याव्यतिरीक्त कोणतीच भूमिका न घेऊन याही मुद्द्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे तीच कबुली दिली,” असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.
विरोधकांकडे लक्ष न देण्याचा समजूतदारपणा…
“एकंदरीत, महाराष्ट्रातील हा कळीचा मुद्दा, राज्य पेटविण्याचा प्रयत्न सुरू असताना यावर सन्मानजनक रीतीने मार्गी लावण्याचे श्रेय ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना जाते, तसेच श्रेय, या प्रश्नात अकारण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांकडे लक्ष न देण्याचा समजूतदारपणा महाराष्ट्राने दाखविले त्या महाराष्ट्रातील जनतेला जाते
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…