शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार, शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील कर्डे-सरदवाडी एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या संकेत महामुनी टोळीतील सदस्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
या टोळीतील गुन्हेगार घ्या उर्फ अभिषेक हनुमान मिसाळ (वय २३), रा. सोनार आळी, शिरूर,शुभम दत्तात्रय दळवी (रा. प्रितम प्रकाशनगर, शिरूर),गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय ३०), रा. गोलेगाव, ता. शिरूर यांना तडीपार करण्यात आले आहे.या आरोपींनी टोळीप्रमुख संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी, ता. शिरूर) याच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी कृत्ये केली आहेत.या टोळीने शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच रांजणगाव एमआयडीसी आणि शिरूर तालुक्यात गावठी पिस्तुलाचा वापर करून खुनाचा प्रयत्न, धमकी, शिवीगाळ, बेकायदा जमाव जमवणे, गंभीर दुखापत करणे, अवैध हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे यांसारखे अनेक गुन्हे केले आहेत.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या टोळीविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शिरूर पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी 2 एप्रिल 2025 पासून पुढील दोन वर्षांसाठी या आरोपींना पुणे जिल्हा (पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासह), तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला.
शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्र तसेच शिरूर तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहतील.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार परशराम सांगळे, सचिन भोई, महेश बनकर, रामदास बाबर, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, निखील रावडे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरीस आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने उचललेले हे कठोर पाऊल भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…
वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…