मुंबई: ‘बिग बॉस’च्या घरात भांडणं, वाद, तंटे हे नवीन नाहीत. मात्र फार क्वचित प्रसंगी हे वाद इतक्या टोकाला जातात की स्पर्धकाला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो. ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनमध्येही अशा घटना घडल्या आहेत.
दुसऱ्या सीझनमधील पराग कान्हेरेची हकालपट्टी, पाचव्या सीझनमधील आर्या जाधवचं बाहेर जाणं आणि आता सहाव्या सीझनमध्ये दिव्या शिंदेची एक्झिट या सगळ्यांच्या मुळाशी एकच कारण दिसतं, रागावर नियंत्रण न राहणं.
नेमकं घडलं काय?
घरात सुरू असलेल्या टास्कमध्ये एकमेकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाची फुली मारायची होती. दिव्याचा आरोप आहे की अशा टास्कमध्ये तिला नेहमीच टार्गेट केलं जातं. त्यामुळे यावेळीही ती आधीपासूनच चिडलेली होती.
अशातच तन्वीने दिव्या बाहेरच्या गोष्टी घरात सांगते, तिला रात्री झोप लागत नाही आणि सकाळी तब्येतीची कारणं देते, असा आरोप केला. हे ऐकताच दिव्याचा संयम ढळू लागला. तरी सुरुवातीला तिने शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा बोलण्याचा आक्रमक सूर इतर सदस्यांना खटकू लागला, तरी बिग बॉसकडून तात्काळ हस्तक्षेप झाला नाही.
‘तो’ क्षण… आणि सगळं हातातून निसटलं
टास्कदरम्यान दिव्याच्या मनातली धुसफूस बाहेर आली. बोलता-बोलता तिच्या भाषेत तलवार चालवणं, जीवे मारण्याची धमकी देणं असे शब्द आले. रुचिताने तिला थेट विचारलं,
“तू धमकी देत आहेस?”
इथेच सगळं बिघडलं.
दिव्याने जर त्या क्षणी शांतता राखली असती, शब्द मागे घेतले असते किंवा अर्थ बदलून घेतला असता, तर परिस्थिती इतकी गंभीर झाली नसती. मात्र तिने,
“हो, ही धमकीच आहे!”
असं ठामपणे सांगितलं.
कन्फेशन रूममध्येही भूमिका बदलली नाही
यानंतर बिग बॉसने दिव्या आणि राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलावलं. बिग बॉस आणि राकेशने तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, पण दिव्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तिच्या भूमिकेवर ठाम राहिली.
खरं निर्णायक वळण तेव्हा आलं, जेव्हा कन्फेशन रूममधून बाहेर आल्यानंतर दिव्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं,
“मी माफी मागणार नाही.”
इथेच सगळे पर्याय बंद झाले. एक साधी माफी, एक क्षणाचा संयम कदाचित तिचा प्रवास पुढे गेला असता. पण तसं झालं नाही.
राग जिंकला, खेळ हरला
खेळात दिव्या कुठेतरी मागे होती, मात्र मोजक्या लोकांशी तिची चांगली नाती होती. त्यामुळे ती घरात टिकून होती आणि तिची दखल घेतली जात होती. मात्र रागाच्या त्या एका क्षणात संयम न राखता तिने बेफिकीरपणा दाखवला आणि अखेर ‘बिग बॉस मराठी ६’मधील तिचा प्रवास संपला.
‘बिग बॉस’मध्ये टास्क जिंकणं महत्त्वाचं असतंच, पण त्याहून महत्त्वाचं असतं — स्वतःवरचा ताबा.
दिव्याच्या बाबतीत, दुर्दैवाने, तोच तुटला.
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…