रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगावच्या प्रवेशद्वारासारखी ओळख असलेल्या यश इन चौकात गेल्या अनेक दिवसांपासुन कचऱ्याचा प्रचंड ढिग साचलेला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावाच्या मुख्य चौकातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले असताना स्वच्छतेच्या गप्पा मारणारे ग्रामपंचायत प्रशासन नेमके कोणत्या कामात व्यस्त आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कचऱ्याच्या ढिगातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. डास, माश्या आणि भटक्या जनावरांनी या ठिकाणी अक्षरशः मुक्काम ठोकला असून भविष्यात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, स्वच्छता, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात गावाच्या मध्यवर्ती चौकात कचऱ्याचे साम्राज्य उभे राहत असेल, तर हा निधी नेमका कुठे आणि कोणासाठी खर्च केला जातो, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र कचरा उचलण्यासाठी किंवा परिसर स्वच्छ करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
स्वच्छ भारत अभियान फक्त फलकांपुरतेच…?
एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, तर दुसरीकडे कारेगावच्या मुख्य चौकात कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे अभियान हे फक्त फलक, बॅनर आणि कागदोपत्री अहवालांपुरतेच मर्यादित राहिले आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
एखाद्या दुर्घटनेची वाट पाहताय का…?
कचऱ्यामुळे दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. एखादी मोठी रोगराई पसरल्यानंतर किंवा गंभीर घटना घडल्यानंतरच ग्रामपंचायत जागी होणार का…? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
तर आंदोलन करु; नागरिकांचा इशारा…
यश इन चौकातील कचरा तात्काळ हटवून नियमित स्वच्छता व्यवस्था सुरु करावी, अन्यथा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. “कारेगाव हे स्वच्छतेच्या घोषणांनी नव्हे, तर यश इन चौकातील कचऱ्याच्या ढिगाने ओळखले जाऊ लागले आहे; ग्रामपंचायत प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे व्हावे” अशी सगळीकडे सध्या दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
मुंबई: बदललेल्या सहकार कायद्याच्या तरतुदींमुळे माजी आमदार राजन पाटील यांना आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, सोलापूर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी…
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित…
पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष…
नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून…