मराठीचा मुद्दा राजकीय नाही, महाराष्ट्र धर्म, भाषा व संस्कृतीच्या आंदोलनात काँग्रेस सहभागी होणार
मुंबई: जगाच्या पोशिंद्याला शिवीगाळ करणे हा विकृतीचा कळस आहे. भाजपाचे माजीमंत्री बबनराव लोणीकर यांची ही मुजोरी सहनशिलतेच्या पलिकडे गेली आहे. बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बबनराव लोणीकर व भाजपाचा समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, भाजपा कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे हे सातत्याने उघड होत आहे. एक भाषा, एक धर्म, एक नेता हा त्यांचा हट्ट आहे आणि आम्हीच सर्वकाही आहोत हा दर्शवणारा घृणास्पद प्रकार आहे. जनतेच्या मतातून सरकार स्थापन होते व जनतेच्या पैशातूनच योजना राबिवल्या जातात. सरकार शेतकऱ्यांना काही देते म्हणजे उपकार करत नाही. नरेंद्र मोदीच सर्व देतात हा लोणीकर सारख्या लोकांचा भ्रम आहे. शेतकऱ्याचा बाप काढणे हा संतापजनक प्रकार आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांनेही आधी शेतकऱ्याला भिकारी म्हणून अपमान केला होता असेही सपकाळ म्हणाले.
दिल्लीच्या आकाच्या इशाऱ्याने शक्तीपीठाचा घाट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाचा घाट दिल्लीच्या आकाच्या इशाऱ्यावर घातला आहे. लाडक्या उद्योगपतींना त्यांचा कच्चा माल विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून गोव्यातील बंदरापर्यंत एक कॉरिडोर हवा आहे, त्यांच्यासाठी हा रेड कारपेट घातला जात आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यास पैस नाहीत, ठेकेदाराला देण्यास पैसे नाहीत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफीस पैसे नाहीत. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. हा खर्च १.५ लाख कोटी पर्यंत जाईल व त्यातून मलिदा खाण्यासाठी हे सर्व सुरु आहेत. महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाण्याची ही सुरुवात आहे. भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्यासाठी नाही तर मुठभर उद्योगपतींसाठी आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
काँग्रेस पक्ष हिंदी सक्तीच्या विरोधात
हिंदी सक्तीविरोधातील मोर्चासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, हिंदी सक्तीच्या विरोधात काही संघटना काम करत आहेत, सरकार विरोधात आंदोलन करण्याचा त्यांनी प्रस्तावही दिला असून मराठी भाषेसाठी जी आंदोलने, मोर्चे काढले जातील त्यात काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होतील. हा विषय पक्षाचा नसून महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा व संस्कृतीचा आहे, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…