मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. जणू इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडवत, या सोहळ्याने सार्वजनिक परिवहनाच्या नव्या युगाची पहाट उजळवली.
या दिमाखदार सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या ऐतिहासिक क्षणाची शोभा अधिकच खुलली.
‘राजमाता जिजाऊ’ हे नाव उच्चारताच मातृत्व, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा मनात जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून केवळ प्रवास नव्हे, तर इतिहासाची प्रेरणादायी परंपरा प्रत्येक प्रवाशाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सुमारे ३००० बसांचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार असून, सुरक्षितता, आराम आणि विश्वास यांचे त्रिवेणी संगम प्रवाशांना अनुभवता येणार आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत ‘राजमाता जिजाऊ’ ही आणखी एक तेजस्वी कडी ठरणार आहे.
पूजन, फीत कापून झालेल्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी या बसमधून प्रवास करत नव्या युगाची सुरुवात प्रत्यक्ष अनुभवली. बसच्या अग्रभागी घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊंचा देखावा जणू इतिहासाला सजीव करत होता—त्या दृश्याने संपूर्ण सोहळ्याला एक अद्भुत, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक आयाम प्राप्त झाला.‘राजमाता जिजाऊ’ बस सेवा म्हणजे केवळ प्रवासाची सुविधा नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, स्वाभिमानाचा आणि प्रगतीचा सजीव प्रवास आहे. जो प्रत्येक प्रवाशाला प्रेरणेचा नवा दीप देत पुढे नेणार आहे.
चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील…
नागपूर: आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि…
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…