छत्रपती संभाजीनगर : “काही बोलावं, कसं सांगावं?” असा प्रश्न निर्माण करणारी घटना आज बीड बायपास रोड परिसरात उघडकीस आली. एका १७ वर्ष ६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असताना पोलिसांनी वेळीच धाड टाकून हा बालविवाह रोखला. दामिनी पथक आणि महिला व बालविकास समितीच्या तत्परतेमुळे एका मुलीचं आयुष्य अंधारातून वाचलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीड बायपास रोडवरील शुभम लॉन्स येथे १२ फेब्रुवारी रोजी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. मंडप सजला होता, पाहुण्यांची लगबग सुरू होती आणि नवरी मुलगी लग्नासाठी नटून-थटून तयार होती. तिचा मेकअप सुरू असतानाच महिला व बालविकास समितीच्या सदस्य आम्रपाली बोर्डे यांना विवाहाबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यांनी तातडीने दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, कविता गवळी, मोनिका दिवे, सुनिता नागलोद तसेच बीट मार्शलचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वय तपासणी करताच धक्कादायक खुलासा
पोलिसांनी नवरी मुलीचे आधार कार्ड तपासले असता ती केवळ १७ वर्ष ६ महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले. अवघ्या सहा महिन्यांनी ती सज्ञान होणार होती; मात्र त्याआधीच तिच्या आयुष्यावर संसाराचं ओझं टाकलं जात होतं. पोलिसांनी तत्काळ विवाह सोहळा थांबवला.
आईची भीती आणि लग्नाचा निर्णय
मुलीच्या आईने आपली भूमिका मांडताना सांगितले की, त्या मुंबईत धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करतात. घरात पुरुष सदस्य नसल्याने आणि कामानिमित्त घराबाहेर राहावे लागत असल्याने मुलीला एकटी ठेवणे सुरक्षित वाटत नव्हते. या भीतीपोटी त्यांनी संभाजीनगरमधील २२ वर्षीय रिक्षाचालकाशी मुलीचे लग्न ठरवले होते.
लग्नासाठी आहेर, भांडीकुंडी यांची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.
समुपदेशन आणि कायद्याची जाणीव
महिला व बालविकास समितीच्या आम्रपाली बोर्डे यांनी पालकांचे लेखी जबाब घेतले. मुलीचे वय पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे तसेच लहान वयात लग्न झाल्यास आरोग्य व शिक्षणावर होणारे दुष्परिणाम याबाबत पालकांना समजावण्यात आले.
दामिनी पथकाने दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून कडक समज दिली. दहावीत शिक्षण घेत असलेल्या या मुलीला आता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
या कारवाईमुळे प्रशासनाची सतर्कता आणि सामाजिक जबाबदारी अधोरेखित झाली आहे. बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून मुलींच्या भविष्यावर घाला घालणारा प्रकार आहे. योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने एका मुलीचे आयुष्य अंधारातून बाहेर काढण्यात यश आले
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…