बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे
परभणी: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या संशयित प्रशांत वाडिले याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. शासनाच्या तिजोरीला तब्बल 160 कोटी रुपयांचा फटका बसविणाऱ्या या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली असून, बनावट विद्यार्थी संख्या, खोट्या शिक्षक मंजुरी आणि शालार्थ आयडीच्या माध्यमातून कोट्यवधींची लूट केल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.
तपासानुसार, वाडिले कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा हेरून तेथील व्यवस्थापनाशी संपर्क साधत असे. ऑनलाइन प्रणालीमध्ये खोट्या नोंदी करून विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरीत्या वाढवली जात होती. त्याआधारे अतिरिक्त शिक्षकांची मंजुरी मिळवून त्यांच्या नियुक्तीचे बनावट प्रस्ताव तयार केले जात. वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्काचा वापर करून या प्रस्तावांना मंजुरी मिळवून शालार्थ आयडी तयार करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
एका शिक्षकाचा शालार्थ आयडी तयार करून देण्यासाठी तब्बल 20 लाख रुपये घेतले जात होते. एवढेच नव्हे, तर आयडी मंजूर झाल्यानंतर मिळणाऱ्या थकीत पगारातील तब्बल 50 टक्के रक्कमही वाडिले वसूल करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या माध्यमातून त्याने कोट्यवधींची मालमत्ता उभी केल्याचा संशय असून, त्याच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेची चौकशी सुरू आहे.
वाडिलेच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात विविध शिक्षकांच्या स्वाक्षरीचे कोरे धनादेश आणि कोरे स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत. शिक्षकांनी नंतर पैसे देण्यास नकार देऊ नये किंवा तक्रार करू नये, यासाठी या कागदपत्रांचा दबावासाठी वापर केला जात असावा, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 27 शिक्षकांचे जबाब नोंदविण्यात आले असून, दोन शाळांतील भरती प्रक्रियाही संशयास्पद आढळली आहे. संबंधित नियुक्त्या, कागदपत्रे आणि मंजुरी प्रक्रियेची सखोल पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, या घोटाळ्याचे धागेदोरे मालेगाव आणि पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. मालेगावातील काही एजंट वाडिलेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. तसेच पुण्यातील एका प्रभावशाली व्यक्तीचीही या प्रकरणात भूमिका असल्याची चर्चा असून, पोलिस त्याच्याही मागावर आहेत. त्यामुळे शालार्थ घोटाळ्यात आणखी मोठे खुलासे आणि नव्या अटकसत्राची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…
न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून अज्ञात चोरट्याने तब्बल ८००…
मुंबई: उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची फी सवलत योजना उपलब्ध…
मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने…