मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे. अपघाताची चौकशी होणारच असून या दुर्दैवी घटनेला घातपाताचा रंग देणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “कोणताही अपघात घडला की त्याची चौकशी होतेच. या प्रकरणातही सखोल चौकशी होणार आहे. मात्र या संवेदनशील घटनेवर राजकारण करणे योग्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही ही घटना घातपाताची नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अफवा पसरवू नयेत.”
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, स्पष्टवक्ता आणि काम करणारा नेता गमावल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. “खासदार, आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे,” असे ते म्हणाले.
बारामती येथे पवार कुटुंबीयांची भेट घेतल्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “कुटुंबीयांच्या वेदना पाहून मन हेलावून गेले. त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची ही वेळ आहे. ईश्वराने या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची ताकद द्यावी.”
ते पुढे म्हणाले की, “ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही. या अपघातात अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असताना राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.”
अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, वित्तमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या अर्थकारणावर बारकाईने लक्ष ठेवले. विकास प्रकल्प, खर्चाचा ताळमेळ, जिल्हानिहाय योजना आणि ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने सरकारलाही मोठा धक्का बसला आहे.
या अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “तांत्रिक बाबींची सखोल चौकशी केली जाईल. संबंधित विमान कंपनी, तांत्रिक तज्ज्ञ आणि यंत्रणांची भूमिका तपासली जाईल. मात्र चौकशीच्या नावाखाली कटकारस्थानाचे आरोप करणे अयोग्य आहे.”
दरम्यान, या अपघातात सहा जणांचे दुर्दैवी निधन झाले असून सर्व मृतांच्या कुटुंबियांप्रती शिंदे यांनी संवेदना व्यक्त केल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अशा दुःखद प्रसंगी एकजुटीने उभे राहणे ही आपली परंपरा आहे. राजकारण बाजूला ठेवून पवार कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घालणे हीच खरी मानवता आहे.”
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…