मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे. अपघाताची चौकशी होणारच असून या दुर्दैवी घटनेला घातपाताचा रंग देणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “कोणताही अपघात घडला की त्याची चौकशी होतेच. या प्रकरणातही सखोल चौकशी होणार आहे. मात्र या संवेदनशील घटनेवर राजकारण करणे योग्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही ही घटना घातपाताची नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अफवा पसरवू नयेत.”
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, स्पष्टवक्ता आणि काम करणारा नेता गमावल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. “खासदार, आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे,” असे ते म्हणाले.
बारामती येथे पवार कुटुंबीयांची भेट घेतल्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “कुटुंबीयांच्या वेदना पाहून मन हेलावून गेले. त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची ही वेळ आहे. ईश्वराने या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची ताकद द्यावी.”
ते पुढे म्हणाले की, “ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही. या अपघातात अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असताना राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.”
अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, वित्तमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या अर्थकारणावर बारकाईने लक्ष ठेवले. विकास प्रकल्प, खर्चाचा ताळमेळ, जिल्हानिहाय योजना आणि ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने सरकारलाही मोठा धक्का बसला आहे.
या अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “तांत्रिक बाबींची सखोल चौकशी केली जाईल. संबंधित विमान कंपनी, तांत्रिक तज्ज्ञ आणि यंत्रणांची भूमिका तपासली जाईल. मात्र चौकशीच्या नावाखाली कटकारस्थानाचे आरोप करणे अयोग्य आहे.”
दरम्यान, या अपघातात सहा जणांचे दुर्दैवी निधन झाले असून सर्व मृतांच्या कुटुंबियांप्रती शिंदे यांनी संवेदना व्यक्त केल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अशा दुःखद प्रसंगी एकजुटीने उभे राहणे ही आपली परंपरा आहे. राजकारण बाजूला ठेवून पवार कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घालणे हीच खरी मानवता आहे.”
शिरूर (तेजस फडके) : महाराष्ट्र पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य म्हणजे 'सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा…
शिरूर (तेजस फडके) : किराणा मालाच्या दुकानात सर्वसामान्यपणे धान्य, तेल, साखर, चहा, साबण आणि दैनंदिन…
मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. व्यवस्थापकीय कौशल्यामुळे वरिष्ठांचे कौतुक…
पंढरपूर: आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी…
पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने सर्व यंत्रणा…
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…