महाराष्ट्र

राज्यात आज उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’; प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार

मुंबई: राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्यभर आज ‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विदर्भ विभागातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध शाळांना भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

‘पहिले पाऊल’ या विशेष उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात येणार असून शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाणार आहे. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि शासकीय शाळांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पटसंख्येतील घट कमी होऊन काही ठिकाणी वाढही नोंदविण्यात आली होती.

यंदा प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याला किमान एका शाळेला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी एक शाळा ‘दत्तक शाळा’ म्हणून स्वीकारून तिच्या शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.

शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांना अंगणवाडी व बालवाडी केंद्रांना भेटी देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यास, पालकांशी संवाद साधण्यास आणि शासकीय शाळांमधील विविध सुविधा व शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमे, ग्रामस्तरीय जनजागृती, दवंडी आणि व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातूनही व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.

राज्यभर या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर ‘शाळा प्रवेशोत्सव कक्ष’ स्थापन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती, छायाचित्रे आणि अहवाल ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदविण्यात येणार आहेत.

शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि ‘शिक्षणसमृद्ध महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

3 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

3 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

3 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

3 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

8 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

8 तास ago