मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या शक्तींनी संविधानाचा स्वीकार करावा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघटनेची नोंदणी करून देणगी कोणाकडून मिळते, याचा हिशोब देशाला द्यावा, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस गुरुचरणसिंग बच्छर, राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे, श्रद्धा ठाकूर, जोजो थॉमस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, देशात संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवले जात असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्यासाठी संघर्ष करत आहेत. राहुल गांधी यांना विविध माध्यमातून त्रास देण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी आपला लढा सोडलेला नाही. त्यांच्या नेतृत्वावर तरुणाईचा विश्वास वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला.
‘जाती-धर्माच्या नावावर भेदभाव देशाला शोभणारा नाही’
देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाही जाती-धर्माच्या नावावर भेदभाव केला जात असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कथित ‘शुद्धीकरण’ केले, तरीही संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
देशातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. संघ आणि भाजपच्या विचारांना तिलांजली दिली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.
गावपातळीवर काँग्रेस संघटन मजबूत करण्याचा संकल्प
चालू वर्ष हे काँग्रेससाठी संघटन बांधणीचे वर्ष असल्याचे सांगत सपकाळ यांनी राज्यातील गावपातळीवर ग्रामशाखा स्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच मंडळ, ब्लॉक, प्रभाग आणि वॉर्ड अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘लाल किल्ल्यावरूनही खोटे बोल, पण रेटून बोल’
दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. लाल किल्ल्यावरून तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्यात आल्या; मात्र मागील १२ वर्षांत करण्यात आलेल्या घोषणांचे काय झाले, याचा जनतेने विचार करावा, असे ते म्हणाले.
महिला आरक्षणाबाबतही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. महिला आरक्षणाला काँग्रेसचा पूर्वीपासूनच पाठिंबा असून २०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…
तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि…
कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच…
मुंबई: विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी…