महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आढावा बैठक संपन्न
पुणे: राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा व त्यामाध्यमातून तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत साठवणूक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
पुणे येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पणन मंत्री श्री. रावल म्हणाले, राज्यात सद्यस्थितीत महामंडळाची उपलब्ध साठवणूक क्षमता ही स्वमालकीची १७.२२ लाख मेट्रिक टन आणि भाडेतत्त्वावरील ७.३३ लाख मेट्रिक टन अशी २४.५५ मेट्रिक टन आहे. येत्या काळात नवीन सुमारे ५२ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम निर्मितीसंदर्भात व्यवहार्य नियोजन करावे. राज्यातील गोदामाचे रेटिंग करुन घ्यावे, जेणेकरून केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ घेता येईल.
राज्यातील गोदामामध्ये सनियंत्रण तसेच कामकाजात पारदर्शकता राहण्याच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसवून त्यांचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात करावे. यामुळे राज्यातील गोदामात उपलब्ध साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये ५० टक्के आणि शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत दिली जाते. साठवणूक केलेल्या मालास १०० टक्के विमा संरक्षण तसेच शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.
धान्य साठवणूकीमुळे बाजारभाव उच्च असतांना शेतकऱ्यांच्या शेतमालाचा चांगला परतावा मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी गोदामामध्ये अधिकाधिक धान्य साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांचे अन्नधान्याचे कापणीनंतरचे नुकसान कमी होऊन त्यांच्या शेतमालास चांगला बाजारभाव मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
शेतकऱ्यांचा शेतीमाल शास्त्रशुध्द पध्दतीने साठविण्यासोबतच कृषी क्षेत्रात अन्नधान्याचा साठा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये धान्य ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास आणि इच्छा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे श्री.रावल म्हणाले.
श्री. दिवेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची मागील तीन वर्षाची तुलनात्मक आर्थिक स्थिती, साठवणूक क्षमता व साठवणूक क्षमता वापर, संस्थानिहाय साठवणूक क्षमता वापर, शेतकऱ्यांसाठी सोयी-सुविधा, शेतमाल तारण कर्ज योजना, हमीभाव खरेदी, साठवणूक नियोजन, गोदाम बांधकाम, प्रस्तावित गोदाम तसेच राज्य शासन, स्मार्ट प्रकल्पाकडे प्रस्तावित प्रकल्पाबाबत माहिती दिली
जांबरगाव ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लवकरच उद्घाटन होणार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगांव येथील ॲग्रो लॉजिस्टीक पार्क निर्माण कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्यामध्ये १० हजार मे. टन क्षमतेचे सायलो दोन गोदामे ६ हजार मे.टन, क्लिनिंग व ग्रेडिंग २ युनीट (५ मे.टन /तास क्षमता), पेट्रोल पंप, सामायिक सुविधा केंद्र, उपहारगृह, ट्रक टर्मिनल, अंतर्गत रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले. त्याचबरोबर लातूर येथील १० हजार मेट्रिक टन क्षमतेचे सायलो निर्माण कार्याचे भूमिपजन करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…