शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात उघडकीस आलेल्या तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. एका निष्पाप महिलेबरोबर तिच्या दोन लहान चिमुकल्यांना निर्घृणपणे ठार मारून पेटवून टाकण्यात आले. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा अमानुष प्रयत्न… या घटनांनी माणुसकीची सगळी सीमा ओलांडली आहे.
या घटनेला केवळ “गुन्हा” म्हणून बघणे चुकीचे ठरेल. ही घटना समाजातील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक गडद आरसा आहे. एक महिला आणि तिची दोन मुलं, कोणत्याही समाजात अत्यंत सुरक्षित गृहीत धरली जातात. मात्र इथे त्यांनाच लक्ष्य करण्यात आलं, तेही इतक्या क्रूर पद्धतीने. त्यांच्या ओळखीची एकमेव शिल्लक खूण म्हणजे महिलेच्या हातावरील ‘जय भीम’ आणि काही इंग्रजी टॅटू. यातून त्या महिलेच्या अस्तित्वाचा आवाज ऐकू येतो — समाजातील एक उपेक्षित, कदाचित अत्याचार सहन करणारी महिला, जी आता केवळ पोळलेल्या शरीराच्या रूपात उरली आहे.
पोलिसांकडून तपास युद्धपातळीवर चालू आहे, ही गोष्ट नक्कीच सकारात्मक आहे. पण या तपासातून केवळ आरोपी सापडणे पुरेसे नाही, तर आपल्याला या घटनांचे मुळ शोधून समाज म्हणून काही कठोर आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. महिलेची ओळख पटेपर्यंत हे प्रकरण अनामिक राहणार आहे. आणि इथेच समाज म्हणून आपली शरम वाटायला हवी — आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना इतकं विसरतो का?
मीडिया आणि जनतेची जबाबदारी….
मीडिया आणि सामान्य नागरिकांनी या प्रकरणाला केवळ “ब्रेकिंग न्यूज” म्हणून न पाहता, या घटनेतील मानवी वेदना समजून घेतल्या पाहिजेत. कोणतीही घटना ही कधीच एकटी राहत नाही; ती आपल्या मनोवृत्तीचे, व्यवस्थेचे आणि सामाजिक जाणीवांचे प्रतिबिंब असते. जर अशी घटना आपल्याला अंतर्मुख करत नसेल, तर आपले समाज म्हणून जिवंत असणेच धोक्यात आले आहे.
या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते — सामाजिक सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा सरकारची जबाबदारी नाही, ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्या शेजारी कोण राहतो, त्यांच्या आयुष्यात काय घडतंय, हे जाणून घेण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक घरात आणि प्रत्येक गल्लीत एक समाज सजग असला पाहिजे. कारण अशा घटनांमध्ये थांबवायचं असेल, तर “माणूस” म्हणून आपली संवेदना जागी असावी लागेल.
रांजणगावात घडलेली ही घटना हे केवळ गुन्हेगारीचे प्रकरण नाही, तर आपल्या समाजाच्या सुन्नपणाचे द्योतक आहे. यातील चिमुकल्या जीवांचा आक्रोश फक्त पोलिसांना नाही, तर प्रत्येक संवेदनशील माणसाला ऐकू यायला हवा. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायदे आणि यंत्रणा यांच्याइतकीच गरज आहे – जिवंत, जागृत, आणि जबाबदार समाजाची..
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…