मुख्य बातम्या

बेट भागात प्रथमच फुलले कमळ; दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात झालेली चौरंगी जिल्हा परिषद निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावडे यांनी विजय मिळवत पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर कमळाचा झेंडा रोवला. या निकालामुळे गावडे घराण्याची प्रतिष्ठा राखली गेली असून माजी आमदार पोपटराव गावडे यांनी याला “स्वाभिमानाची लढाई” असे संबोधले.

राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील विसंवाद कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आंबेगावचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी या निवडणुकीत अपेक्षित सक्रियता दाखवली नसल्याची टीका होत आहे. तिकीट वाटपातील अचानक बदल आणि स्थानिक कार्यकर्त्यांना योग्य दिशा न दिल्यामुळे पक्षाला फटका बसल्याचे बोलले जात आहे.

राजेंद्र गावडे यांचे राष्ट्रवादीकडून तिकीट कापण्यात आल्यानंतर बेट भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. गावडे समर्थकांमध्ये निर्माण झालेली नाराजी मतदानात स्पष्टपणे दिसून आली. दुसरीकडे दामूअण्णा घोडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. या निर्णयात खासदार अमोल कोल्हे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. मात्र या प्रक्रियेत वळसे पाटील यांना विश्वासात घेतले गेले नसल्याची चर्चा आहे. परिणामी संघटनात्मक पातळीवर आवश्यक ते बळ मिळाले नाही, असा आरोप घोडे गटाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, तुतारी गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या भूमिकेबाबतही विविध चर्चा रंगल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेल्या मतभेदांचा परिणाम या निवडणुकीवर झाल्याचे सांगितले जाते. डॉ. सुभाष पोकळे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली; मात्र अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने त्यांच्या गटात नाराजी पसरली आहे. काही स्थानिक सूत्रांच्या मते, मतदानाच्या अंतिम टप्प्यात मतदारांच्या कलात झालेला बदल निर्णायक ठरला.

बाळासाहेब डांगे यांनी ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत मराठा समाजाच्या मुद्द्यावर प्रचार केला. मात्र मतांची विभागणी झाल्याचा परिणाम एकूण समीकरणांवर झाला. विशेष म्हणजे, डांगे आणि पोकळे यांच्या एकत्रित मतांएवढीच मते दामूअण्णा घोडे यांना मिळाल्याचे चित्र दिसून आले.

या सर्व राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फायदा भाजप उमेदवार राजेंद्र गावडे यांना झाला. राष्ट्रवादीकडून तिकीट कापल्यानंतर गावडे घराण्याने भावनिक भूमिका घेत जनतेसमोर आपली बाजू मांडली. त्यासोबतच बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि विविध गटांतील मतांची सांगड घालण्यात त्यांनी यश मिळवले. परिणामी, बेट भागातील राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला भेदला गेला.

या निकालामुळे दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नाराज कार्यकर्त्यांची भूमिका यामुळे राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

एकूणच, बेट भागातील हा निकाल केवळ एका जागेचा पराभव नसून अंतर्गत विसंवादाचे प्रतिबिंब असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात राष्ट्रवादी नेतृत्व कोणती भूमिका घेते आणि संघटनात्मक पातळीवर कोणते बदल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

5 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

5 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

7 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago