शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिरूर तालुक्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. ढोल-ताशे, घोषणा, वाहनांच्या रांगा आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता.
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांसाठी ५३ उमेदवारांनी एकूण ८२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी १०५ उमेदवारांनी तब्बल १४७ अर्ज दाखल केले. या मोठ्या संख्येमुळे अनेक गट-गणांमध्ये बहुरंगी व अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक उमेदवारांनी समर्थकांसह भव्य रॅली काढून अर्ज दाखल केले. पक्षचिन्हांचे फलक, नेत्यांची छायाचित्रे आणि घोषणांमुळे शिरूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनालाही विशेष बंदोबस्त ठेवावा लागला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र गावडे, त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे आणि डॉ. सुभाष पोकळे यांनी टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटातून तूल्यबळ शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. बेट भागातील ग्रामस्थ, युवक, महिला आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा गट चुरशीचा ठरण्याचे संकेत मिळाले.
दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांनी शिरूर–न्हावरे जिल्हा परिषद गटातून भाजपकडून अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीत बाबूराव पाचर्णे यांचे छायाचित्र असलेले फलक झळकत असल्याने वातावरण भावनिक झाले होते. ‘स्मृतींचा वारसा आणि अनुभवाचा विश्वास’ या भावनिक मुद्द्यांवर ही उमेदवारी आकार घेत असल्याचे दिसून आले.
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव तृप्ती सरोदे यांना अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अखेर त्यांनी शिंदे शिवसेनेच्या वतीने शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणातून शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीत महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
याशिवाय महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे तसेच भाजपकडून कुसूम खैरे यांनीही आपापल्या गट-गणांतून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांचा प्रभाव वाढल्याचे चित्र आहे.
एबी फॉर्मवरून घोळ, अखेरच्या क्षणापर्यंत नाट्य
अनेक गट व गणांमध्ये उमेदवारीचे घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. काही ठिकाणी एका पक्षाची उमेदवारी दोन उमेदवारांना देण्यात आल्याचे प्रकार समोर आले, तर काही अधिकृत उमेदवारांना वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने मोठी धावपळ झाली. तहसील कार्यालय परिसरात पक्षांचे पदाधिकारी एबी फॉर्म घेऊन ठाण मांडून बसल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.
एकूणच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या शक्तीप्रदर्शनामुळे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती न राहता प्रतिष्ठा, अस्तित्व आणि आगामी विधानसभा राजकारणाची नांदी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…