१० तासांनी पेरूच्या बागेत सुखरूप सापडल्या
नाशिक: नाशिकरोड परिसरात मंगळवारी दुपारी अभ्यासासाठी घराबाहेर पडलेल्या दहावीतील तीन अल्पवयीन मुली संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने एकच खळबळ उडाली. पालक आणि नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र मुलींचा पत्ता न लागल्याने अखेर नाशिकरोड पोलीस ठाणे येथे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सुमारे दहा तासांनंतर चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरातील एका पेरूच्या बागेत तिन्ही मुलींना भेदरलेल्या अवस्थेत सुखरूप शोधून काढले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मालधक्का परिसरात राहणाऱ्या या तिन्ही मुली सध्या दहावीत शिक्षण घेत आहेत. त्यापैकी दोन मुली सख्ख्या बहिणी असून त्या आपल्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी ये-जा करतात. मंगळवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास दोन्ही बहिणी मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेल्या होत्या. घरासमोरील शेतात तिघी जणी अभ्यास करत बसल्या असताना मैत्रिणीची आई देखील जवळच काम करत होती.
साडे तीनच्या सुमारास आई पाणी भरण्यासाठी घरात गेल्याची संधी साधून तिघींनी तेथून निघ काढला. बाहेर पडताना त्यांनी “झेरॉक्स काढायला जातो” असे सांगितले होते. प्रत्यक्षात त्या एका मित्राला भेटण्यासाठी गेल्याची माहिती पुढे समोर आली.
संध्याकाळपर्यंत परत न आल्याने धावपळ
सायंकाळ झाली तरी मुली घरी न आल्याने पालकांची चिंता वाढली. त्यांनी इतर मैत्रिणींच्या घरी चौकशी केली. रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; मात्र मुलींचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहिती दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. पहाटे चार वाजता एका मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तिघी मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली.
रात्रभर सुरू होती शोधमोहीम
पोलिसांनी चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरात तसेच आसपासच्या भागात कसून शोध घेतला. अखेर बुधवारी सकाळी चेहेडी परिसरातील एका पेरूच्या बागेत तिन्ही मुली घाबरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले व पुढे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
भीतीपोटी रात्रभर बागेतच ठाण मांडून
पोलिसांनी विचारणा केली असता, घरी परतायला उशीर झाल्याने घरचे रागावतील या भीतीने आपण घरी न जाता पेरूच्या बागेतच थांबलो, अशी कबुली मुलींनी दिली. किर्र अंधारात आणि निर्जन ठिकाणी त्यांनी रात्र काढल्याचे समजताच पालकांसह पोलिसांनीही डोक्यावर हात मारला.
सुदैवाने या तिन्ही मुली सुरक्षित सापडल्या असून त्यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याची आणि त्यांच्या हालचालींकडे अधिक लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…