पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात उद्या, मंगळवार (११ ऑगस्ट) रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तब्बल १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी रस्त्यावर उतरल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
बालवडकर यांनी म्हटले आहे की, एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना इंधनाची बचत करण्यासाठी वाहनांचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन करतात. मात्र, दुसरीकडे भाजपकडूनच हजारो दुचाकींचा सहभाग असलेली रॅली आयोजित केली जात आहे. त्यामुळे या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.
पुणे शहर आणि परिसर आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत हजारो दुचाकींची रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आल्यास वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना रॅलीत सहभागी होण्यासाठी दुचाकींचे लक्ष्य देण्यात येत असल्याचा आरोपही बालवडकर यांनी केला आहे.
११ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता रॅलीला सुरुवात होणार असल्याने वाहतूक कोंडीचा मुद्दा अधिक गंभीर ठरू शकतो, असेही बालवडकर यांनी म्हटले आहे. सायंकाळच्या वेळेत कार्यालये सुटत असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर आधीच वाहनांची मोठी गर्दी असते. त्यात हजारो दुचाकींची भर पडल्यास त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांसमोरही मोठे आव्हान असणार आहे. रॅलीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, आवश्यकतेनुसार वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे तसेच आपत्कालीन सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ न देणे, यासाठी वाहतूक पोलिसांना विशेष नियोजन करावे लागणार आहे.
आता भाजपच्या तिरंगा रॅलीमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर नेमका किती परिणाम होतो आणि वाहतूक पोलिसांकडून कोणती उपाययोजना केली जाते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
मध्य प्रदेश: इथेनॉल मिश्रणावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार…
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या…
पुणे: पुणे शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे…
नवी दिल्ली : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना…
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य जगासमोर सिद्ध केले, तर शिवसेनेच्या वतीने…
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह…