मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने बुधवारी (ता. १८) घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयाच्या प्रश्नपत्रिकेची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ती एका विद्यार्थिनीच्या व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रप्रमुखांच्या सतर्कतेमुळे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर होण्यापूर्वीच संबंधित विद्यार्थिनीला ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेसाठी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परीक्षेपूर्वी एका वर्गात बसलेली विद्यार्थिनी प्रसाधनगृहात जात असल्याचे सांगून बाहेर गेली. बराच वेळ उलटल्यानंतरही ती परत न आल्याने पर्यवेक्षक शिक्षिकेला संशय आला. काही वेळाने ती परत आल्यानंतरही पेपरदरम्यान ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने तिच्या हालचाली अधिक संशयास्पद वाटल्या.
शिक्षिकेने तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळला. फोन सुरू करून पाहिल्यानंतर व्हॉट्सॲप ग्रुपवर रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका शेअर झाल्याचे दिसून आले. तपासात ही प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच तिच्याकडे आल्याचे स्पष्ट झाले. संबंधित ग्रुपवर संभाव्य उत्तरांचाही आदानप्रदान झाल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती तत्काळ केंद्रप्रमुखांना देण्यात आली. त्यांनी मंडळाला कळवून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी विद्यार्थिनीची चौकशी केली असून तिच्या जबाबावरून आणखी एका विद्यार्थिनीची चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासात एका खासगी शिकवणी वर्गाशी संबंधित व्यक्तीने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून मोबाईल आणि व्हॉट्सॲप ग्रुपमधील संदेशांचा तांत्रिक तपास सुरू आहे.
अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याची शक्यता
विद्यार्थिनी ज्या ग्रुपमध्ये सहभागी होती, त्यामधून ही प्रश्नपत्रिका शहरातील इतर विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार केवळ एका केंद्रापुरता मर्यादित नसून राज्यातील इतर भागांपर्यंत प्रश्नपत्रिका लीक झाली का, याचा सखोल तपास सुरू आहे.
प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, कोणत्या तांत्रिक माध्यमातून ती व्हायरल झाली आणि या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…