स्वतंत्र चौकशीची अमोल मातेले यांची मागणी
मुंबई: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊनही केवळ सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांचेच प्रवेश पूर्ण झाल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.
ॲड. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर किमान ९० टक्के प्रवेश पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक संभ्रमाच्या स्थितीत आहेत. उर्वरित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी फेऱ्या घ्याव्या लागल्यास महाविद्यालयांचे नियमित अध्यापन किमान आणखी एक महिना उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.
निकाल लवकर जाहीर केल्याचा सरकारने गाजावाजा केला, मात्र प्रवेश प्रक्रियाच वेळेत पूर्ण होत नसेल तर लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्रवेश प्रक्रियेत अनावश्यक विलंब का होत आहे, जागा उपलब्ध असूनही प्रवेश का होत नाहीत, यामागे तांत्रिक किंवा प्रशासकीय त्रुटी आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या हिताशी संबंधित या प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार, हलगर्जीपणा किंवा अनियमितता झाली आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्य मागण्या :
तीन फेऱ्यांनंतरही कमी प्रवेश होण्यामागील कारणे तातडीने जाहीर करावीत.
प्रवेश प्रक्रियेचे स्वतंत्र व निष्पक्ष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे.
रिक्त जागा आणि प्रवेशांची संपूर्ण आकडेवारी सार्वजनिक करावी.
उर्वरित प्रवेश प्रक्रिया वेगाने पूर्ण करून महाविद्यालये नियमित सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी पारदर्शक आणि वेळबद्ध प्रवेश प्रक्रिया राबवावी.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रवेश प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष विद्यार्थी व पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…
मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…
मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…