मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कारभारावरून गेल्या काही महिन्यांपासून अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यातील मतभेद चर्चेत होते. महामंडळाचा कारभार संथ असल्याचा, तसेच पोर्टल बंद ठेवण्यात आल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता. देशमुख यांच्या बदलीची मागणीही त्यांनी केली होती. अखेर या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, विजयसिंह देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अण्णासाहेब पाटील महामंडळातील अध्यक्ष आणि एमडी यांच्यातील वादाची राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महामंडळाचा कारभार अपेक्षित गतीने होत नसल्याचा आरोप केला होता. तसेच महामंडळाच्या पोर्टलशी संबंधित समस्यांमुळे तरुण उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या मराठा समाजातील तरुण उद्योजकांमध्येही एमडींच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला होता. मंजूर झालेल्या काही तरुणांचे एलओआय अचानक रद्द झाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या सर्व बाबींची दखल घेऊन नरेंद्र पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू केला होता.
पाच जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना अहवाल
नरेंद्र पाटील यांनी नुकताच पाच जिल्ह्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यात मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी त्यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. महामंडळाच्या माध्यमातून कर्ज व आर्थिक सहाय्य मिळवताना येणाऱ्या अडचणी तसेच प्रलंबित प्रकरणांचा मुद्दाही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता.
विखे पाटलांचीही घेतली होती भेट
तरुण उद्योजकांच्या तक्रारीनंतर नरेंद्र पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी महामंडळाच्या कारभाराबाबत तसेच व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी मांडल्या होत्या.
नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना ‘मराठाद्वेषी अधिकारी’ असे संबोधले होते. त्यांच्या कार्यपद्धतीचा फटका मराठा समाजातील तरुण उद्योजकांना बसत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या आरोपांमुळे महामंडळातील अंतर्गत वाद चांगलाच चर्चेत आला होता.
दरम्यान, आता विजयसिंह देशमुख यांची बदली झाल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची नियुक्ती करण्यात आली असून, महामंडळाचा कारभार आता नव्या नेतृत्वाखाली कोणत्या दिशेने जातो, याकडे तरुण उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८…
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक…
आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात…
व्हिटॅमिन बी-१२ हे 'सायनोकोबालामिन' म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक…