सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या कथित गुन्ह्यांची यादी जाहीर केली. अंधारे यांच्या या आरोपांवरून आता भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी अंधारे यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना, “अंधारेंचा पायगुण असा आहे की, त्या शिवसेनेत गेल्या आणि शिवसेनेचं अस्तित्वच संपल्यासारखं झालं,” असा टोला लगावला. सुषमा अंधारे आणि त्यांच्या पक्षाला राज्यात कोणीही विचारत नाही. काहीतरी मिळेल या उद्देशाने त्या जयकुमार गोरे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“जयकुमार गोरे जिल्ह्यात आल्यानंतर आमदार, नगरसेवक अशी ताकद निर्माण झाली. मात्र सुषमा अंधारे सोलापुरात आल्या आणि त्यांच्या मागे साधा सरपंचही दिसला नाही,” असा दावा कल्याणशेट्टी यांनी केला.
सार्वजनिक जीवनात काम करत असताना आमच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे अंधारे यांनी आरोप करण्यापूर्वी त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या गुन्ह्यांची यादी वाचून दाखवावी, असे आव्हानही कल्याणशेट्टी यांनी दिले. मुंबई महापालिकेत त्यांच्या पक्षाने काय केले, याची यादी आम्हीही वाचून दाखवू शकतो; मात्र आम्ही व्यक्तिगत टीकेपेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देतो, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार देवेंद्र कोठे यांनीही अंधारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “सुषमा अंधारे या पंक्तीला बसल्या आणि जेवण संपलं,” अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली. अंधारे यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्ववादी विचार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता त्या शिवसेनेत गेल्या असल्याचे सांगत कोठे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
“शिवसेनेची वाताहत झाली आणि त्याचवेळी आमच्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योती वाघमारे यांना खासदारकी मिळाली. त्यामुळे सुषमा अक्का यांना प्रचंड नैराश्य आले असून त्या वैफल्यातून बडबड करत आहेत,” असा टोला कोठे यांनी लगावला.
जयकुमार गोरे हे स्वकर्तृत्वावर चार वेळा निवडून आले असून सोलापूरसह सांगली, सातारा, माढा आणि धाराशिवमध्ये त्यांनी पक्ष संघटना वाढवली आहे, असा दावा कोठे यांनी केला. एखाद्या नेत्याला त्याच्या विकासकामातून किंवा राजकीय कामातून रोखता येत नसेल, तेव्हा व्यक्तिगत टीका केली जाते, असेही त्यांनी म्हटले.
सुषमा अंधारे यांचा जयकुमार गोरे यांच्यावर वैयक्तिक राग नसून त्या सोलापुरात आल्यानंतर त्यांना सतत खासदार ज्योती वाघमारे दिसत असाव्यात. त्यातूनच त्यांची ही बडबड सुरू असल्याचे कोठे म्हणाले.
“सोलापुरात येऊन स्वतःच्या पक्षातील लोकांना भेटण्याऐवजी दुसऱ्या पक्षातील लोकांना त्या भेटत असतील, तर त्यांच्या पक्षाची संघटना किती शिल्लक आहे, हे स्पष्ट होते. त्यांच्याकडे पक्षाचा ठोस अजेंडा किंवा संघटना वाढवण्याचे मुद्दे नाहीत. त्यामुळेच त्या इतर नेत्यांवर आरोप करत आहेत,” अशी टीकाही कोठे यांनी केली.
सुषमा अंधारे यांच्या आरोपांनंतर भाजप आमदारांनी केलेल्या या जोरदार पलटवारामुळे सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८…
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक…
आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात…
व्हिटॅमिन बी-१२ हे 'सायनोकोबालामिन' म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक…