मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’चा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानसज्ज होणार आहे. दहशतवादी व समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून बसस्थानकांपासून विभागीय कार्यालयांपर्यंत डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल ₹111 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच भोसरी येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था अशा संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
633 ठिकाणी 7035 कॅमेरे
राज्यातील एकूण 633 ठिकाणी 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. संशयास्पद हालचाली तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
TCILकडे प्रकल्पाची जबाबदारी
ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या Telecommunications Consultants India Limited (TCIL) या अनुभवी संस्थेकडे प्रकल्पाची अंमलबजावणी सोपविण्यात आली आहे. एकूण कालावधी एक वर्ष निश्चित करण्यात आला असून, काम वेगाने सुरू आहे.
मुंबईत मध्यवर्ती नियंत्रण कक्ष
या प्रकल्पाचा कणा ठरणारा अत्याधुनिक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबईत उभारण्यात आला आहे. त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (UAT) यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, येथून राज्यभरातील सर्व कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत नियंत्रण ठेवले जाणार आहे.
पायलट टप्पा यशस्वी
पायलट टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागांतील 64 महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली बसविण्यात आली आहे. उर्वरित 27 विभागांसह विविध कार्यशाळा व कार्यालयांमध्ये कॅमेरे बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा ऐतिहासिक टप्पा आहे. यामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवता येईल.’यामुळे ‘लालपरी’चा प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…