महाराष्ट्र

उबाठासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

धनुष्यबाण राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्याबद्दल मतदारांचे मानले आभार

मुंबई: पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्या उबाठासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती, अशी खरमरीत टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडीबॅग घोटाळे करणाऱ्यांनी टोमणे मारण्यापेक्षा स्वत:मध्ये डोकावून बघावे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

नगर परिषदांच्या निकालांमधून शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली आहे. घराघरात धनुष्यबाण पोहोचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, लोकसभेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. विधानसभा निवडणुकीतही स्ट्राईक रेट इतर पक्षांच्या तुलनेत चांगला होता. आता कमी जागा लढून जास्त जागा जिंकलो हा देखील चांगला स्ट्राईक रेट आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमदार नसलेल्या ठिकाणीही शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, असे ते म्हणाले. राज्यात शिवसेनेचे ६२ नगराध्यक्ष निवडून आले असून हा आकडा ७० पर्यंत वाढेल, असे ते म्हणाले. यात शिवसेनेच्या ३३ लाडक्या बहिणी नगराध्यक्षपदी निवडून आल्या, असे ते म्हणाले. नगर परिषद निवडणुकीत उबाठा आणि महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं. जे घरी बसले त्यांना कायमचे घरी बसवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेनं केलं, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या नगराध्यक्षांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्यांची नाळ शिवसेनेची जोडलेली आहे, ती कधीही तुटू शकत नाही. शिवसेनेला हरवणं अशक्य आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिका निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना विरोधकांच्या आरोपाला कामातून उत्तर दिलं. अडीच वर्ष काम करत राहिलो ते महाराष्ट्राने पाहिलं म्हणून विधानसभा निवडणुकीत २३२ जागा महायुतीला मिळाल्या. लाडकी बहिण योजनेला अनेकांनी विरोध केला मात्र शब्द पाळला आणि ही योजना सुरु झाली. करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सर्वात मोठी ओळख मला मिळाली, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

राज्यात मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी उपक्रम राबवला होता. साडेपाच कोटी नागरिकांना याचा फायदा झाला होता. आता बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त आरोग्य विभागाकडून‘ आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. या गौरव सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

2 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

12 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

13 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

17 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

17 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

17 तास ago