मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांची नावं अखेर जाहीर करण्यात आली आहेत. नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईच्या नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
महायुतीकडून भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्या वॉर्ड क्रमांक 132 च्या नगरसेविका आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. संजय घाडी हे दहिसर येथील वॉर्ड क्रमांक 5 चे नगरसेवक आहेत. उपमहापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल, अशी माहिती शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी बैठकीत दिली.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवली होती. महायुतीचे एकूण 118 नगरसेवक निवडून आले असून, त्यात भाजपचे 89 तर शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांनी महापौर व उपमहापौर पदांची घोषणा केली.
मनसेपासून शिवसेनेपर्यंतचा संजय घाडी यांचा प्रवास
मुंबईचे नवे उपमहापौर संजय घाडी हे एकेकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत राजकारणाची सुरुवात केली होती. 2007 साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर संजय घाडी मनसेमध्ये सक्रिय होते आणि त्यांनी मनसेकडून निवडणूकही लढवली होती.
यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. संजय घाडी यांच्या पत्नी संजना घाडी या सुद्धा नगरसेविका होत्या. मात्र, मागील वर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मागील महिन्यात संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले असून, आता त्यांच्यावर मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संजय घाडी यांचा राजकीय आणि शैक्षणिक प्रवास
संजय शंकर घाडी हे 57 वर्षांचे असून त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यांनी बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे. मुंबई महानगरपालिका शाळेत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतलं, तर दादर येथील छबिलदास हायस्कूलमधून दहावी पूर्ण केली. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे.
1988-89 पासून ते शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख होते. 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस, शिवसेनेचे उपनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली असून, सध्या ते शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…