महाराष्ट्र

महायुतीचा विजय! मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांची नावं अखेर जाहीर करण्यात आली आहेत. नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईच्या नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

महायुतीकडून भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्या वॉर्ड क्रमांक 132 च्या नगरसेविका आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. संजय घाडी हे दहिसर येथील वॉर्ड क्रमांक 5 चे नगरसेवक आहेत. उपमहापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल, अशी माहिती शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी बैठकीत दिली.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवली होती. महायुतीचे एकूण 118 नगरसेवक निवडून आले असून, त्यात भाजपचे 89 तर शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांनी महापौर व उपमहापौर पदांची घोषणा केली.

मनसेपासून शिवसेनेपर्यंतचा संजय घाडी यांचा प्रवास

मुंबईचे नवे उपमहापौर संजय घाडी हे एकेकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत राजकारणाची सुरुवात केली होती. 2007 साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर संजय घाडी मनसेमध्ये सक्रिय होते आणि त्यांनी मनसेकडून निवडणूकही लढवली होती.

यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. संजय घाडी यांच्या पत्नी संजना घाडी या सुद्धा नगरसेविका होत्या. मात्र, मागील वर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मागील महिन्यात संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले असून, आता त्यांच्यावर मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संजय घाडी यांचा राजकीय आणि शैक्षणिक प्रवास

संजय शंकर घाडी हे 57 वर्षांचे असून त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यांनी बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे. मुंबई महानगरपालिका शाळेत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतलं, तर दादर येथील छबिलदास हायस्कूलमधून दहावी पूर्ण केली. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे.

1988-89 पासून ते शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख होते. 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस, शिवसेनेचे उपनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली असून, सध्या ते शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

5 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

5 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

6 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

6 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

7 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

7 तास ago