मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केल्या आहेत. “अत्यंत धक्कादायक… अजूनही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या.
“अजितदादांसारख्या धडाडीच्या नेत्याचं असं अचानक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. उमद्या, सतत हसतमुख आणि जिंदादिल व्यक्तीच्या अकस्मात निधनाची बातमी कधी कानावर येईल, असं मलाच काय तर महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला वाटलं नसेल. मात्र दुर्दैवाने हे वास्तव स्वीकारण्याची कठीण वेळ आज आपल्यावर आली आहे. व्यक्तिगत मला स्वतःलाही यातून सावरणं खूप अवघड जाणार आहे,” असे भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
‘कडक शिस्तीचे प्रशासक’ अशी ओळख असलेल्या अजित पवार यांनी अर्थमंत्री तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांनी आतापर्यंत तब्बल ११ वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला असून, ते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री ठरले आहेत. प्रशासकीय शिस्त, पायाभूत सुविधा आणि आर्थिक नियोजन यावर त्यांचा विशेष भर होता.
पिंपरी-चिंचवड शहराला ‘सर्वात वेगाने विकसित होणारे शहर’ बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बारामती, पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपल्या धडाडीच्या कामातून वेगळा ठसा उमटवला. तळागाळातील शेवटच्या माणसाचा विचार करणारा हा लोकनेता पहाटे पाच वाजल्यापासून कामाला लागून महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटत होता, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्याशी आपले ऋणानुबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीपासून असल्याचे सांगत भुजबळ म्हणाले, “करारी, रोखठोक स्वभाव असलेल्या अजितदादांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पवारसाहेबांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची नस ओळखणारा, जमिनीवरील नेता म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.”
रोखठोक स्वभाव, प्रशासनावर घट्ट पकड आणि दरारदार व्यक्तिमत्त्व असूनही अजितदादा मनाने अतिशय स्वच्छ आणि जिंदादिल होते. पत्रकारांशी बोलताना प्रतिकूल प्रश्नांवरही मिश्किल उत्तर देणारे, चूक झाल्यास मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करणारे दादा महाराष्ट्राने पाहिले आहेत. “दादांनी माझ्या ज्येष्ठत्वाचा नेहमीच सन्मान केला. त्यांनी मला आणि भुजबळ कुटुंबाला दिलेले प्रेम कायम स्मरणात राहील,” असे सांगत भुजबळ यांनी पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली.“दादा, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही,” अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…