मुंबई: राज्यातील अल्पवयीन मुला-मुलींना ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडिया आणि चॅटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग, लैंगिक शोषण तसेच अमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समन्वित राज्यस्तरीय उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १५ ऑगस्ट रोजी राज्यपालांना निवेदन देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांची विशेष बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात ‘Roblox’ या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याच्या घटनेचा उल्लेख डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात केला आहे. तसेच नागपूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाच्या तपासाचा ९ ऑगस्ट रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष आढावा घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
सायबर गुन्हे, बाल लैंगिक शोषण आणि अमली पदार्थांचा गैरवापर या घटनांकडे स्वतंत्रपणे न पाहता बालसुरक्षा, सायबर सुरक्षा, अमली पदार्थ प्रतिबंध आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित एकत्रित आव्हान म्हणून पाहण्याची गरज आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
राज्यातील अनधिकृत स्मोकिंग सेंटर, हुक्का पार्लर तसेच पान-सिगारेट आणि स्नॅक्स दुकानांच्या आडून अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
संशयास्पद केंद्रांची माहिती नागरिक आणि लोकप्रतिनिधींना गोपनीय पद्धतीने देता यावी, यासाठी प्रभावी हेल्पलाईन किंवा डिजिटल तक्रार व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
“ऑनलाईन ग्रूमिंग, बाल लैंगिक शोषण आणि अमली पदार्थांचे आंतरजिल्हा स्वरूप लक्षात घेता विविध यंत्रणांमध्ये अधिक प्रभावी समन्वय आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मुला-मुलींची सुरक्षितता ही त्यांच्या सुरक्षित भवितव्याशी निगडित सामाजिक जबाबदारी आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली गृह, पोलीस, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, सायबर पोलीस आणि अमली पदार्थविरोधी यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात यावी. या बैठकीत कालबद्ध राज्यस्तरीय कृती आराखडा निश्चित करावा तसेच बालसुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही बैठकीस आमंत्रित करावे, अशी विनंती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
मुंबई: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांसह…
मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे.…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेदांपासून विरोधकांच्या सरकारवरील टीकेपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय…
मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा विचार केला तर पुणे जिल्ह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुण्याला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे): उरळगाव (ता. शिरुर) येथील गट क्रं १६५ मधील दोन बोअरवेलमधून अज्ञात चोरट्याने…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा…