ठाणे: कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम गेली १९ वर्षे सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, “घरातील कार्यक्रमासाठी जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो, त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. कच्छी समाज विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान करून समाजाला प्रेरणा देत आहे.” यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ४० वर्षीय तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांच्या समाजसेवेचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील तर ते सुरेश गडा आहेत.” आषाढी बीज हा कच्छी समाजाचा नववर्षाचा सण असल्याचे सांगत त्यांनी समाजबांधवांना शुभेच्छाही दिल्या.
ठाण्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, डबल डेकर रस्ते आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शहराची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे सांगितले. अहमदाबाद-घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोस्टल रोडमार्गे वळविण्यात येणार असल्याने ठाणे शहर वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणावर मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यापारी समाजाच्या सुरक्षिततेला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत त्यांनी ठाण्यात उद्योग-व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच साकेत परिसरातील त्रिमंदिर, प्रस्तावित कॅन्सर हॉस्पिटल आणि महावीर हॉस्पिटलसारख्या उपक्रमांमुळे आरोग्य क्षेत्रातही मोठी प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कच्छी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून अज्ञात चोरट्याने तब्बल ८००…
मुंबई: उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची फी सवलत योजना उपलब्ध…
मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने…
मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण…
वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई:…
शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ६० वर्षीय महिलेचा मारहाण करून खून झाल्याची धक्कादायक…