छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अक्षरशः ‘दृश्यम’ चित्रपटाच्या धर्तीवर बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
या घटनेतील मयत राजाराम उत्तम लोंढे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर शहरात राहत होते. विशाल राठोड आणि आकाश पवार हे त्यांचे जवळचे मित्र होते. हे तिघे नेहमी एकत्र फिरत असत. आरोपींनी “खतरों के खिलाडी”सारखा खेळ सुरू करायचा असल्याचे सांगत लोंढे यांच्याकडून मोठी रक्कम घेतली होती. मात्र पैसे परत देणे शक्य नसल्याने त्यांनी हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.
आरोपींनी आधीच खोदले खड्डे
पूर्वनियोजित कटानुसार आरोपींनी गेवराई तांडा परिसरात जेसीबीच्या सहाय्याने सुमारे पाच फूट खोल असे दोन खड्डे खोदून ठेवले होते. हत्येच्या दिवशी त्यांनी लोंढे यांना सोबत घेऊन दौलताबाद परिसरात दारू पार्टी केली. त्यानंतर परतत असताना लोंढे यांच्या परवानाधारक पिस्तुलातूनच त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी विविध ठिकाणी फिरल्याचा बनाव रचला. तसेच लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहिती दिली. दरम्यान, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
मोबाईल पुण्यात नेऊन सुरू
तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी मृत प्राध्यापकांचा मोबाईल पुण्यात नेऊन सुरू केला आणि “मला कुणी त्रास देऊ नका, मी २५ ते ३० दिवस येणार नाही” असा स्टेटस ठेवून फोन बंद केला. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
चौकशीत उघड झाला गुन्हा
मयताचे बंधू उत्तम लोंढे यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन विशाल राठोड व आकाश पवार यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान आकाश पवार वारंवार “मी दारू प्यायलो होतो, मला काही आठवत नाही,” असे सांगत होता. मात्र विशाल राठोड याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.
मृतदेह एक दिवस गाडीत
आरोपींनी सांगितले की, लोंढे हे पैसे परत मागत होते आणि वारंवार अपमान करत होते. त्यामुळे रागातून त्यांनी हत्येचा कट रचला. खून केल्यानंतर मृतदेह एक दिवस गाडीत ठेवण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री करण आडे या साथीदाराच्या मदतीने गेवराई तांडा परिसरातील आधी खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरण्यात आला.या प्रकरणी पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली असून प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार असल्याचे समोर आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…