पुणे : डाळिंबाचा हंगाम सुरू होताच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची विक्रमी आवक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतून तब्बल १०० टन डाळिंब बाजारात दाखल झाले. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने डाळिंबाच्या घाऊक दरात घट झाली आहे.
घाऊक बाजारात प्रतवारीनुसार डाळिंबाला ३० ते ५० रुपये किलो दर मिळत असून, किरकोळ बाजारात मात्र १५० ते २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पुणे बाजारपेठेतून देशभरातील विविध बाजारपेठांमध्ये डाळिंब पाठविले जाते.
बारामती, सांगोला, पंढरपूर, इंदापूर आणि पुरंदर परिसर हा डाळिंब उत्पादनाचा महत्त्वाचा पट्टा मानला जातो. यंदा या भागात समाधानकारक पाऊस झाल्याने डाळिंबाच्या बागांना चांगला फायदा झाला आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी किडीच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांना जुन्या बागा काढून टाकाव्या लागल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बागांची लागवड करण्यात आली. यंदा या नव्या तसेच जुन्या बागांमधून उत्पादन वाढले आहे.
गेल्या वर्षी डाळिंब हंगामात पुणे मार्केट यार्डात दररोज साधारण ५० ते ७० टन आवक होत होती. त्या वेळी प्रतवारीनुसार घाऊक बाजारात डाळिंबाला १०० ते १२० रुपये किलोपर्यंत दर मिळाला होता. यंदा मात्र आवक वाढल्यामुळे दरात मोठी घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
डाळिंब व्यापारी आणि श्री शारदा गजानन अडते संघटनेचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले की, यंदा डाळिंबाचा हंगाम चांगला बहरला आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची आवक होत आहे. समाधानकारक पावसामुळे लागवडही चांगली झाली असून, उत्तम प्रतीच्या मालाला चांगला दर मिळत आहे. आगामी काळात डाळिंबाची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डाळिंब व्यापारी सिद्धार्थ खैरे यांनी सांगितले की, किडीच्या प्रादुर्भावामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वी डाळिंब उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. आता परिस्थितीत सुधारणा झाली असून, लाल दाणे, रसाळ आणि आकाराने मोठ्या डाळिंबांना बाजारात चांगली मागणी आहे.
आवक वाढल्याने शेतकऱ्यांना यंदा उत्पादनाचा फायदा होत असला, तरी बाजारभावात झालेली घसरण त्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणारी ठरू शकते. आगामी काळात आवक आणि बाजारातील मागणी यानुसार डाळिंबाचे दर कसे राहतात, याकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर…
शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक…
सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार…
धनुष्यबाणाच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे-शिंदे गटात खडाजंगी; नेमकं काय घडलं? नवी दिल्ली : शिवसेना पक्ष…
मुंबई : टाटा समूहाबाबत आज मोठी बातमी समोर आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन…
मुंबई : आकाशप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार…