महाराष्ट्र

लोककल्याणकारी राज्यासाठी शिवरायांचा विचारच मार्गदर्शक

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी येथे केले.

किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून राज्याच्या विकासासाठी त्यांच्या आदर्शांचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मंत्री, खासदार-आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषातून संकटांशी लढण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी प्रजेला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणकारी राज्य उभारले. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा आणि पराक्रम यांच्या जोरावर त्यांनी काळाच्या पुढे विचार करणारे शासन दिले. आज आपण ज्या विकास मॉडेलचा विचार करतो, त्याचा पाया महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी घातला होता. अर्थव्यवस्था, जलव्यवस्थापन, शहर नियोजन, पायाभूत सुविधा, पर्यावरण यांचा त्यांनी दूरदृष्टीने विचार केला. मोहिमेतून आर्थिक लाभ झाला की त्यांनी किल्ले उभारणीसाठी वापर करून राज्य बळकट केले. शिवराई चलन निर्माण करून स्वतंत्र आर्थिक व्यवस्था उभी केली, धरणे-कालवे बांधले, घाटरस्ते विकसित केले आणि आरमार उभारून सामर्थ्य वाढवले.

महाराज शेतकऱ्यांवर जिवापाड प्रेम करणारे राजे होते. मावळे युद्धासाठी सीमोल्लंघन करून जात आणि अक्षय तृतीयेला परत येऊन शेतीची कामे करत, अशी शेतकरी-सैनिक संकल्पना त्यांनी निर्माण केली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी कठोर आज्ञा त्यांनी दिली होती. त्यामुळे “अन्नदाता बळीराजा हा मायबाप आहे” हीच भूमिका आजच्या सरकारची असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिवनेरी व परिसरातील जुन्नर भागाच्या सर्वांगीण विकासाला सरकार प्राधान्य देणार असून स्थानिक मागण्या गांभीर्याने विचारात घेत आवश्यक सुविधा उभारल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पर्यटन सर्किट उभारणे, स्वच्छता-संवर्धन मोहिम राबवणे आणि ऐतिहासिक वारसा जपणे यावर सरकार भर देत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गड-किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धन मोहिमाही हाती घेतली जाणार आहे. मराठा लष्करी लँडस्केप म्हणून ११ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी किल्ल्यांच्या जतनासाठी व्यापक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

स्वदेशी आणि आत्मनिर्भरता हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे मुख्य तत्त्व होते. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा मंत्र देशाला महासत्ता बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल. महायुती सरकारने लाडकी बहीणसह विविध लोककल्याणकारी योजना राबवून महिलांना आत्मसन्मान व आत्मनिर्भरता देण्याचे काम सुरू केले आहे.

शिवरायांच्या गनिमी काव्याचा अभ्यास जगभर केला जात असून दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात त्यांच्या युद्धनीतीवर अभ्यासक्रम सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. भूगोलाची जाण, दूरदृष्टी आणि युद्धकौशल्यामुळे त्यांनी बलाढ्य शक्तींना नमवले आणि आजही त्यांचे विचार प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात. विकसित भारताच्या निर्मितीसाठी आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी शिवरायांचा आदर्श महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

“आपण सर्व शिवरायांचे मावळे आहोत. प्रत्येकाने महाराजांचा किमान एक गुण अंगीकारला तर स्वाभिमानी, सुरक्षित आणि बलशाली महाराष्ट्र घडेल,” असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि जय शिवरायच्या घोषणांनी शिवनेरी दुमदुमून गेला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

4 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

4 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

4 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

4 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

4 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

4 तास ago