मुंबई: NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने नियोजित परीक्षा रद्द करण्याची वेळ आली असून, यामुळे तब्बल ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवारांवर अन्याय झाल्याची टीका विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
तांबे यांनी या घटनेला केवळ पेपरफुटी नव्हे, तर राज्यातील भ्रष्ट आणि ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. “महाराष्ट्रात आता ‘पेपरफुटी’ हीच नवी परीक्षा पद्धत झाली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, NEET, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC-NET तसेच विविध प्रवेश आणि भरती परीक्षांमधील अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
TET प्रकरण अधिक गंभीर असल्याचे सांगताना तांबे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे २० ते ३० वर्षे सेवा केलेले आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षकही नोकरी टिकवण्यासाठी ही परीक्षा देत आहेत. अशा परिस्थितीत पेपरफुटी होणे म्हणजे त्यांच्या नोकरीवर आणि कुटुंबाच्या भवितव्यावर घाला घालण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले.
“देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ८० वर्षे झाली. जग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचले आहे. मात्र आपण अजूनही परीक्षा सुरक्षित घेऊ शकत नाही, MPSC चे निकाल वेळेत लावू शकत नाही आणि परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन अशा गोंधळात अडकलेल्या आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
तांबे यांनी सांगितले की, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविषयी त्यांनी नुकतेच विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले होते. “या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी भ्रष्टाचार असून व्यवस्था पारदर्शक झाली तर अनेकांचे हितसंबंध धोक्यात येतील. त्यामुळे काहींना ही व्यवस्था सुधारलेलीच नको आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
केवळ आरोपींना अटक करून हा प्रश्न सुटणार नसून परीक्षा प्रणालीची संपूर्ण पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे तांबे यांनी नमूद केले. सरकारने परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…
मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला.…
मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी…
पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची…