गडचिरोली: “आजही आमच्या गावात अनेक मुलींची लग्नं १८व्या वर्षीच लावली जातात. इच्छा नसतानाही दबावाखाली लग्न करावं लागतं. हे थांबवायचं आहे,” असे ठाम शब्द गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी गावातील २१ वर्षांची शारदा रवींद्र दुगुनलावार उच्चारते. समाजात बदल घडवण्याच्या याच जिद्दीच्या जोरावर तिने देशातील नामांकित शिव नाडर युनिव्हर्सिटी, दिल्ली (एनसीआर) येथे एम.ए. इन रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. या उच्च शिक्षणासाठी तिला तब्बल ११ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली असून सध्या ती दिल्लीत शिक्षण घेत आहे.
दुर्गम व आदिवासी भागातील वास्तवाशी झुंज देत शारदाने शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. प्राथमिक शिक्षण गावात झाले, मात्र उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तिला गावापासून १२ किलोमीटर दूर चार्मोशी येथे दररोज सायकलने प्रवास करावा लागत असे. “अभ्यासापेक्षा कॉलेजला जाऊन परत कसं यायचं, हीच जास्त चिंता असायची. बसची सोय नव्हती,” असे शारदा सांगते.
प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी आई-वडिलांचा सुरुवातीला नकार होता. मात्र वर्गशिक्षक डॉ. पंकज नरुले यांच्या समुपदेशनानंतर अखेर शारदाला परवानगी मिळाली. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून समाजकार्याची पदवी तिने घेतली. शिक्षण व हॉस्टेलचा खर्च विद्यादान सहाय्यक मंडळ या ठाणेस्थित स्वयंसेवी संस्थेच्या मदतीमुळे शक्य झाला.
समाजकार्य शिकताना गावातील प्रश्न सतत डोळ्यांसमोर असल्याने ग्रामीण भागात बदल घडवण्याची तिची इच्छा अधिक तीव्र झाली. कॉलेजमधील एका सीनियरकडून शिव नाडर युनिव्हर्सिटीबाबत माहिती मिळाल्यानंतर तिने प्रवेश परीक्षा, मुलाखत व गटचर्चेसाठी तयारी केली आणि यश मिळवले.
युनिव्हर्सिटीच्या सहायक प्राध्यापक डॉ. गुरकिरत कौर सांगतात, “रुरल मॅनेजमेंट कोर्समध्ये केवळ गुणांपेक्षा ग्रामीण भागात बदल घडवण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. शारदाची स्पष्ट दृष्टी आणि मेहनत यामुळे तिची निवड झाली.” हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुमारे १२ लाख रुपये खर्चाचा असून शिष्यवृत्तीतून राहणे, जेवण व शैक्षणिक खर्च पूर्ण केला जातो. अभ्यासक्रमानंतर समाजसेवी संस्थांमध्ये प्लेसमेंटही दिली जाते.
शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर अनेक मुलींनी “आम्हालाही शिकायचं आहे” असे सांगत शारदाशी संपर्क साधल्याचे ती आनंदाने सांगते. “माझ्यासारखी संधी इतर मुलींनाही मिळावी,” हीच तिची इच्छा आहे.
शारदाचे आई-वडील शेतमजूर आहेत. वडील शेतीची अवजारे व फर्निचर बनवतात. “गावातल्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून पोरीनं आमचं नाव मोठं केलं. पोरीला शिकवलं, हेच आमचं भाग्य,” असे वडील रवींद्र दुगुनलावार अभिमानाने सांगतात.
भविष्यात आदर्श गावाची संकल्पना आपल्या गावात प्रत्यक्षात उतरवण्याचं स्वप्न शारदा पाहते. मेधा पाटकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पर्यावरण व समाजासाठी काम करण्याचा तिचा निर्धार आहे. शारदाचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नाही, तर दुर्गम भागातील मुलींसाठी आशेचा किरण ठरत आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…