लातूर: “आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे का देत नाहीत? आमचा सांभाळ का करत नाहीत?” असा जाब विचारत पोटच्याच २९ वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी खोपेगाव (ता. लातूर) येथे घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
खोपेगाव पाटी परिसरात राहणारे कृष्णकुमार संभाजी सन्मुखराव (वय ५४) हे लातूर येथील आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास कृष्णकुमार आणि त्यांचा मोठा मुलगा शंतनू (वय २९) यांच्यात वाद झाला. शंतनूची आई आजारी असून औषधोपचारासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली जात होती. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात शंतनूने घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून वडिलांच्या मानेखाली जोरदार वार केला. हा वार इतका भीषण होता की, कृष्णकुमार सन्मुखराव यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मयताचा धाकटा मुलगा समीर कृष्णकुमार सन्मुखराव (वय २३) याने दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी शंतनूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आरोपी शंतनू हा पदवीधर असून बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णकुमार सन्मुखराव यांनी खोपेगाव पाटी येथे जागा खरेदी करून नवीन घर बांधले होते. मंगळवारी सकाळी कार्यालयात जाण्याच्या तयारीत असताना पत्नी व मुलामधील औषधोपचाराच्या पैशांवरून झालेल्या वादातून ही दुर्दैवी घटना घडली.
“औषध-गोळ्यांच्या खर्चावरून आई-वडील आणि मुलामध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला,” अशी माहितीअरविंद पवार, पोलिस निरीक्षक, लातूर ग्रामीण यांनी दिली.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…